काँग्रेसची घोषणा ,आम्ही लाडक्या बहिणींना 2000 रुपये देणार
Congress announcement, we will give 2000 rupees to beloved sisters

राज्यात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चलती असून राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून जोमाने या योजनेच्या अनुषंगाने प्रचार व प्रसार सुरू आहे.
सत्ताधारी या योजनेचा लाभ आपल्याला मिळावा म्हणून महिला भगिनींना आवाहन करताना दिसून येतात. तर, विरोधकांकडून ही योजना निवडणुकांच्या तोंडावर आणल्याचे सांगत सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं जातंय.
तसेच, आमचं सरकार आल्यास ह्या योजनेच्या रकमेत अधिक वाढ करू, असे आश्वासनही दिलं जात आहे. आता, थेट काँग्रेसचे राष्ट्राय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महाराष्ट्र दौऱ्यात सांगलीतून भाषण करताना
राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली. आमचं सरकार आल्यास आम्ही लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये महिन्याला देऊ,
असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले. विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार राहुल गांधी हेही व्यासपीठावर उपस्थित होते.
मल्लिकार्जुन खर्गे हे सांगलीत दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी, बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. तसेच,
राज्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळ्यासंदर्भात आणि लाडकी बहीण योजनेबाबतही भाष्य केलंय. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी हे 1 लाख 70 हजार मतांनी जिंकले आहेत.
मात्र, विश्वजीत कदम हे एका विधानसभेत 1 लाख 40 हजार मतांनी जिंकल्याचं सांगत खर्गे यांनी मोदींवर टीका केली. तसेच, शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हात लावला तो पडला,
राम मंदीराला हात लावला ते गळत आहे, गुजराच्या पुलाचं उद्घाटन केल तर तो पुल पडला, मोदी येत आहेत, म्हणून पुतळा लवकर बनवा आणि तो बनवला आणि पडला, असे म्हणत पुतळा कोसळल्यावरुन नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं.
आमचं सरकार आल्यास लाडकी बहिण योजनेसाठी तुम्हाला 2 हजार रुपये देणार, तुम्ही तुमचा सन्मान मोदी यांच्यासमोर गहाण ठेवणार आहे का, मोदी सरकारने तोडण्या फोडण्याच्या पलिकडे काय केल ते सांगा,
महाराष्ट्र जर जिंकला तर सारा देश जिंकेल आणि लवकरच भाजपच सरकार जाईल, असेही खर्गे यांनी म्हटले. यावेळी, राज्यातील लाडकी बहीण
योजनेसंदर्भात बोलताना त्यांनी मोठी घोषणा केली आहे. या योजनेतील पात्र महिलांना 2000 रुपये देण्याचं त्यांनी जाहीर केलंय.
राम सुतार यांनी मूर्ती बनवल्या त्या 50 वर्षांपासून आहेत, मात्र आरएसएस बनवतात ते पडत आहेत. शाळेतीलअभ्यासक्रम बदलत आहेत, संविधान बदलत आहेत,
आणखी २० जागा मिळाल्या असत्या तर मोदी सरकार दिसलं नसतं, असेही खर्गे यांनी सांगलीतील सभेत म्हटले. तसेच, खरी शिवसेना आमच्या सोबत आहे,
खरी राष्ट्रवादी शरद पवार यांच्यासोबत आहे, त्यांच्या बाजून सर्व नकली आहेत. त्यामुळे या निवडणुकीत लक्षात ठेवा, खर स्वातंत्र्य हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान आणि नेहरु यांच्या दुरदृष्टीने मिळालं होतं, असेही खर्गे यांनी म्हटलं.
मोदी आणि शहा यांच्या मनात शरद पवार यांच्याबद्दल काय प्रेम आलं माहीत नाही, त्यांनी झेड प्लस सुरक्षा दिली. जेव्हा गरज होती त्यावेळी त्यांनी दिली नाही,
आता जनता सुरक्षा करत आहे, मग कशाला देता. जो घाबरतो त्याला सुरक्षा लागते, असे म्हणत पुन्हा एकदा मोदींवर हल्लाबोल केला.








