मुस्लिम बहुल मतदारसंघावर काँग्रेसचा दावा तर गुजराथी बहुल शिवसेनेच्या माथी मारण्याचा प्रयत्न
Congress's claim on the Muslim-majority constituency is an attempt to attack the Gujarati-majority Shiv Sena

महाविकास आघाडीतील जागावाटपाचा घोळ अद्यापही सुटलेला नसून काँग्रेस पक्ष शिवसेनेवर दबाव आणत असल्यामुळेच हा तिढा कायम असल्याचे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, मुस्लिम मतदारांची संख्या मोठी असलेल्या बहुतांश जागा काँग्रेसला हव्या आहेत, तर गुजरातीबहुल जागा शिवसेनेच्या गळ्यात मारण्यासाठी काँग्रेस आग्रही आहे.
महाविकास आघाडीतील जागावाटपाचे प्रमुख सूत्र हे ‘सिटिंग गेटिंग’ असे होते. तरीही शिवसेनेने गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या अनेक जागांवर काँग्रेसने दावा केला आहे.
शिवसेनेची भायखळा, चांदिवली या जागा काँग्रेसला हव्या आहेत. तर चांदिवलीच्या बदल्यात वांद्रे पूर्व ही जागा सोडण्यासदेखील काँग्रेस तयार नाही.
भाजपचे आमदार असलेल्या ज्या मतदारसंघांमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे, अशा वर्सोवासारख्या मतदारसंघासाठीही काँग्रेस प्रचंड आग्रही आहे.
मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला असताना काँग्रेस लोकसभेतील निकालाचा दाखला देत प्रचंड आक्रमक झाल्याचे शिवसेनेतील सूत्रांचे म्हणणे आहे.
मुंबईतील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला आपले प्रतिनिधित्व हवे आहे. त्यातही ज्या जागा लढण्यास तुलनेने सोप्या आहेत, त्या जागा काँग्रेसला हव्या आहेत.
त्याचवेळी काँग्रेस विदर्भात शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना मिळून १७ ते १८ जागांपलीकडे काहीही देण्यास तयार नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे विदर्भातील आहेत.
लोकसभेच्या निवडणुकीत विदर्भात काँग्रेसचा निकाल चांगला लागला. त्यामुळे काँग्रेस पक्ष ४५ ते ५० जागांवर लढणार असल्याचे काँग्रेसचे नेते सांगत आहेत.
शिवेसेनेतील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, मराठवाड्यात काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे पक्ष सोडून गेले आहेत.
त्यांच्या पाठोपाठ त्यांचे काही आमदारही सोडून गेले आहेत. मात्र तरीही मराठवाड्यात काँग्रेसला सर्वाधिक जागा हव्या आहेत.
काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या जागांच्या दुराग्रहाशी पक्षाचे प्रभारी चेन्नीतला हेदेखील सहमत असल्यासारखे त्यांचे वर्तन असल्याचे शिवसेनेतील सूत्रांचे म्हणणे आहे.
त्यामुळे शिवसेनेचे नेतृत्व अस्वस्थ आहे. या वातावरणामुळे महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी जो समन्वय दिसत होता,
तो सध्या अभावानेच दिसत आहे. उद्धव ठाकरे यांची नाराजी वाढली, तर लोकसभेच्या निकालांनी हुरळून गेलेल्या आघाडीला प्रत्यक्षात कठीण काळाचा सामना करावा लागू शकतो, असे सांगितले.







