राज्यात सर्वात कमी पाऊस हिंगोली जिल्ह्यात
Hingoli district has the lowest rainfall in the state

मुंबईसह राज्यात जूनअखेर निर्माण झालेली पाणीचिंता जुलैच्या पावसाने संपवली. पावसाळ्याच्या दोन महिन्यांच्या अखेरीस राज्यात ३९ टक्के अतिरिक्त पाऊस नोंदला गेला आहे.
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अवघ्या तीन आठवड्यांमध्ये अतिरिक्त किंवा तीव्र अतिरिक्त पाऊस पडला असून, केवळ हिंगोली जिल्ह्यात पावसाची मोठी तूट आहे.
राज्यात दोन महिन्यांत सरासरी ५३४ मिलीमीटर पाऊस पडतो. पण यंदा त्याने ७४० मिलीमीटरची सरासरी गाठली. कोकण विभागात ३ जुलैनंतर पावसाचा जोर वाढायला सुरुवात झाली.
उत्तर आणि दक्षिण कोकणात २४ जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यानंतर उत्तर कोकणात तो किचिंत कमी झाला. मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे,
तसेच घाट भागांमध्ये जुलैमध्ये सातत्यपूर्ण पाऊस आहे. २४ ते ३१ जुलै या अखेरच्या आठवड्यातही सोलापूर जिल्हा वगळता उर्वरित मध्य महाराष्ट्रात पावसाची जोरदार उपस्थिती होती.
मराठवाड्यात १० ते १७ जुलैपर्यंतच्या आठवड्यात, तसेच २४ ते ३१ जुलैपर्यंतच्या आठवड्यात बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली. विदर्भात १७ ते ३१ जुलैपर्यंत
अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची सरासरीपेक्षा अतिरिक्त उपस्थिती होती. १७ जुलैपर्यंतच्या आठवड्यात विदर्भात अकोल्यात ३२७ टक्के, भंडाऱ्यात ४३३, बुलडाण्यात ३६६ टक्के पाऊस अतिरिक्त असल्याची नोंद झाली आहे.
या अतिरिक्त पावसाचा एकंदरच राज्यातील पावसाच्या आकडेवारीत मोठी वाढ होण्यासाठी मदत झाली. मात्र यामुळे राज्यात
ठिकठिकाणी पूरस्थितीही निर्माण झाली. हिंगोलीत मात्र १ जून ते ३१ जुलै या कालावधीत पावसाची एकूण तूट ४८ टक्के तूट नोंदली गेली आहे.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चारही धरणे बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ९० टक्के भरली होती.
त्यामुळे धरण प्रकल्पात २६.२० अब्ज घनफूट (टीएमसी) इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत याच दिवशी २२.७३ टीएमसी इतका साठा उपलब्ध होता.
त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा साडेचार टीएमसी पाणी अतिरिक्त जमा झाले आहे. खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये बुधवारी दिवसभरात पाऊस झाला.