विधानसभा निवडणुकीत तिसरी नंतर आता होतेय चौथी आघाडी
After the third in the assembly elections, now the fourth alliance is taking place

विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आघाडी घेणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला आता आणखी एक मित्रपक्ष मिळण्याची शक्यता आहे.
शेतकरी चळवळीतील नेते रविकांत तुपकर यांच्यासोबत वंचितच्या प्रकाश आंबेडकरांची बोलणी सुरु आहे. दोघांमधील चर्चा सध्या प्राथमिक टप्प्यात आहे.
बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी यांनी एकत्र येत तिसरी आघाडी स्थापन केली. पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये पत्रकार परिषद घेत त्यांनी परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीची घोषणा केली.
यानंतर आता राज्यात चौथ्या आघाडीच्या हालचाली सुरु आहेत. प्रकाश आंबेडकर आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यात प्राथमिक स्तरावर चर्चा सुरु आहे. येत्या आठवड्याभरात दोघांची भेट होण्याची शक्यता आहे.
दलित आणि ओबीसी हा वंचितचा मतदार मानला जातो. तुपकर सोबत आल्यास शेतकऱ्यांचं मतदान वंचितकडे वळू शकतं.
आंबेडकर आणि तुपकर एकत्र आल्यास पश्चिम विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये विधानसभा निवडणुकीची समीकरणं काही प्रमाणात फिरु शकतात. सध्याच्या घडीला वंचितनं विधानसभेसाठी ११ उमेदवार जाहीर केले आहेत.
रविकांत तुपकर यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बुलढाण्यातून अपक्ष उमेदवारी केली. त्यांनी तब्बल अडीच लाख मतं घेतली.
त्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात मत विभाजन झालं. त्याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसल्याचं सांगण्यात येतं. बुलढाण्यातून शिंदेसेनेच्या प्रतापराव जाधवांनी साडे तीन लाख मतं घेतली.
तर ठाकरेसेनेच्या नरेंद्र खेडेकर यांना ३ लाख २० हजार ३८८ मतदान झालं. खेडेकर २९ हजार ४७९ मतांनी पराभूत झाले. सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील मतांचं विभाजन झाल्याचा फटका त्यांना बसल्याचं बोललं जातं.
विशेष म्हणजे अपक्ष लढून अडीच लाख मतं घेणाऱ्या तुपकरांनी सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातून ३० हजारांचं मताधिक्क्य मिळवलं. बुलढाणा, चिखली, मेहकर मतदारसंघांमध्येही त्यांना लक्षणीय मतदान झालं.
शेतकरी चळवळीतून पुढे आल्यानं तुपकरांच्या मागे मोठा शेतकरी वर्ग आहे. त्यामुळे आंबेडकर आणि तुपकर एकत्र आल्यास काही मतदारसंघांमध्ये चित्र बदलू शकतं. घासून होणाऱ्या लढतींमध्ये चौथ्या आघाडीची मतं निर्णायक ठरु शकतात.