भुजबळ आधी राजीनामा द्या, मग बोला,मंत्र्यानीच दिला सल्ला
Bhujbal first resign, then speak, advised the minister

ओबीसीचा मुद्दा पुढे करून आंदोलन सुरू आहे, याची काहीच गरज नव्हती. कारण दोन समाजात सुरू असलेला वाद निरर्थक आहे, असे सांगतानाच मंत्री छगन भुजबळ हे सध्या जी भूमिका मांडत आहेत,
ते त्यांनी मंत्रीमंडळातून बाहेर पडून बोलावे अशी भूमिका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केली.
राधाकृष्ण पाटील यांच्या या भूमिकेमुळे भुजबळ यांना घरचा आहेर मिळाला आहे. यातून हा वाद वाढण्याची शक्यता आहे.
कोल्हापुरात करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी ते आले होते. तेव्हा पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ओबीसी विरुद्ध मराठा सुरू असलेला वाद निरर्थक आहे.
हा वाद वाढू नये यासाठी मंत्री भुजबळ यांनी संयम पाळण्याची गरज आहे. आज त्यांच्याबद्दल लोकं आदराने बोलत आहेत, नंतर मात्र त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करावी लागेल अशा इशारा देताना ते म्हणाले,
भुजबळ यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर येऊन बोलले पाहिजे. कारण त्यांच्या भूमिकेमुळे सरकारमध्ये एकवाक्यता नाही असा मेसेज जातो. त्यातून सरकार बाबतची विश्वासार्हता कमी होते.
विखे पाटील म्हणाले, भुजबळ यांनी राजीनामा दिला पाहिजे नाही तर त्यांच्या बाबत वेगळी भूमिका घेण्याबाबत सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी विचार केला पाहिजे.
मराठा आरक्षणासंदर्भात जे आंदोलन सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवरती शासनाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोणतेही आरक्षण कमी न करता आपण मराठा समाजासाठी आरक्षण द्यायला हवे त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.