निवडणुकीचा एक्झिट पोल म्हणजे काय? त्याची प्रक्रिया कशी असते?
What is an Election Exit Poll? How is it processed?

देशातील पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकासाठीचे मतदान झाले. तेलंगणा राज्यात 30 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पूर्ण होईल.
निवडणूक आयोगाने 7 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत एक्झिट पोल जाहीर करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे गुरुवारी 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 नंतर एक्झिट पोलची आकडेवारी बाहेर येण्यास सुरवात होईल.
लोकसभा किंवा त्या त्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पूर्ण झाल्यानंतर एक्झिट पोल जाहीर केले जातात. त्यामुळे या एक्झिट पोलकडे राजकीय नेत्यांचे तसेच जनतेचे लक्ष लागलेले असते. मात्र, एक्झिट पोल म्हणजे नेमकं काय? त्यासाठी काय केलं जातं? त्याचे नियम काय आहेत? हे जाणून घेऊ.
देशातील कोणत्याही राज्यात निवडणूक जाहीर झाली आणि मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतरच त्यादिवशी संध्याकाळी ‘एक्झिट पोल’चे निकाल जाहीर केले जातात.
‘एक्झिट पोल’ म्हणजे निवडणूक झालेल्या राज्यात कुणाची सत्ता येणार आणि कोण सत्तेबाहेर जाणार याचा वर्तविलेला अंदाज. हा निकला जाणून घेण्याची उत्सुकता लोकांना असते.
‘एक्झिट पोल’ने वर्तविलेला अंदाज हा अनेकदा खरा ठरतो. त्यामुळेच एक्झिट पोलकडे लोकांचे लक्ष लागलेले असते. परंतु, याच एक्झिट पोलची प्रक्रिया ही कठीण अशी असते.
मतदानाच्या अखेरच्या दिवशीच हा एक्झिट पोल नेहमी जारी केला जातो. यामागे कारण असे की मतदान प्रक्रियेवर त्याचा कोणताही प्रभाव पडू नये. मात्र असे असले तरी ज्या वेळी निवडणूक जाहीर होणे ते मतदान होईपर्यंत ‘एक्झिट पोल’ची प्रक्रिया होत असते.
निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेक खाजगी संस्था ‘एक्झिट पोल’च्या प्रक्रियेला सुरवात करतात. यामध्ये जनतेची मते जाणून घेतली जातात.
विद्यमान सरकारच्या कामगिरीचा आढावा, त्यांनी जनतेची केलेली विकास कामे, विरोधकांचे आरोप, नव्या सरकारकडून असलेल्या अपेक्षा याचा सर्व्हे केला जातो. याचा शेवट हा मतदानाच्या दिवसी होतो.
मतदानाच्या दिवशी मतदार मतदान केंद्राच्या बाहेर आल्यानंतर मतदान कुणाला केलं हे विचारलं जातं. आधीचे प्रश्न आणि झालेले मतदान याचे विश्लेषण करून एक अंदाज बांधला जातो आणि त्यानुसार राज्यात कुणाची सत्ता येणार, कोणत्या पक्षाला किती आणि कुठे जागा मिळणार याचा आराखडा बांधला जातो.
एक्झिट पोलचे आकडे बाहेर आल्यानंतर आणखी दोन दिवसांनी आणखी एक पोल बाहेर येतो तो म्हणजे पोस्ट पोल. एक्झिट पोल पेक्षा पोस्ट पोल हा महत्वाचा मानला जातो.
याचे कारण म्हणजे मतदान झाल्यानंतर दोन दिवस मतदारांना गाठून त्यांच्या चराच करून त्यांनी कुणाला मतदान केले हे जाणून घेतले जाते.
पोस्ट पोल सर्व्हे करताना मतदाराने मतदान करून झालेले असते त्यामुळे तो ठाम उत्तर देतो. म्हणून या सर्व्हेला अधिक महत्व आहे. या प्रक्रियेमध्ये जे माहिती देतात त्यांची ओळख गुप्त ठेवली जाते.