निवडणुक जिंकण्यासाठी अंडरवर्ल्डची मदत’; संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ
Underworld's Help to Win Elections'; Excitement due to Sanjay Raut's claim

ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी महायुतीमधील घटक पक्षांकडून निवडणूक जिंकण्यासाठी अंडरवर्ल्डशी संबंधित गुंडांची मदत घेतली जात असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
यासंदर्भात बोलताना महायुतीमधील घटक पक्षांनी अनेक मतदारसंघांमध्ये निवडणूक जिंकण्याची जबाबदारी गुंडांकडे सोपवली असून या गुंडाची यादीही आपण पोलिसांना द्यायला तयार असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे.
इतकेच नव्हे तर पोलिसांचाही यामध्ये समावेश असून रात्री हे गुंड आणि पोलिसांमध्ये बैठका होतात जिथे पोलीस गुंडाचे आदेश स्वीकारुन महाविकास आघाडीसाठी काम करणाऱ्यांविरोधात कारवाया करतात असं राऊत म्हणाले आहेत.
विक्रोळीमधील जाहीर सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी राऊतांवर टीका केली. यासंदर्भात विचारलं असता राऊत यांनी, “खरं म्हणजे आज महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांमध्ये गुंडांचं राज्य निर्माण झालेलं आहे
त्यावर राज ठाकरेंनी बोलावं. राज ठाकरे ज्या भागात भाषण करुन गेले तिथे अंडरवर्ल्डच्या मदतीने निवडणुका लढवल्या जात आहेत,” असा दावा केला.
“शिंदे आणि भाजपाकडून! मुंबईतील अनेक मतदारसंघांमध्ये ठाण्यात, पुण्यात अनेक नामचिन गुन्हेगार, ज्यांचा कधीकाळी अंडरवर्ल्डमध्ये सहभाग होता किंवा आहे,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.
इतक्यावरच न थांबता मुंबईतील कायदा सुव्यवस्थेचे प्रमुख असलेले सत्यनारायण चौधरी यांना आपण अशा गुंडांची यादी देण्यासही तयार असल्याचं राऊत म्हणाले. “मी त्यांची नावं देऊ शकतो.
सत्यनारायण चौधरी या पोलीस अधिकाऱ्यांना. जे लॉ आणि ऑर्डरचे प्रमुख आहेत. जसं आम्ही संपर्कप्रमुख नेमतो त्याप्रमाणे या गुंड डोळ्यांच्या मोहऱ्यांवर विधानसभेच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे,” असा दावा राऊतांनी केला आहे.
पुढे बोलताना, “कांजूरमार्ग, विक्रोळी, भांडूप, ठाणे, दादर, कोपरी-पाचपाखाडी, कलिना, ठाणे शहर, कुर्ला येथे निवडून गुंड घेतले आहेत. काहींना जामीन करुन घेतलं आहे.
अनेकांना पक्षप्रवेश दिला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गुंडांच्या बैठका होतात हे धक्कादायक आहे. हे गुंड ज्या ज्या निवडणूक क्षेत्रात नेमून देण्यात आले आहेत त्यांच्याशी पोलिसांच्या रात्री बैठकी होतात.
या गुंडांकडून पोलीस आदेश घेतात. आम्ही निवडणूक आयोगाला ही माहिती देणार आहेत. पोलीस गुंडांकडून आदेश घेतात आणि महाविकास आघाडीला मदत करणाऱ्यांविरोधात खोटे गुन्हे दाखल करणे,
त्यांना तडीपार करणे, त्यांच्याकडे पोलिसांना पाठवायचं. त्यांना धमक्या द्यायच्या,” अशी कामं केली जात असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.
“माझं पोलिसांना आवाहन आहे. तुम्ही लक्षात घ्या सरकार बदलत असतं. सरकारं जात येत असतात. गुंडांच्या मदतीने कोणाला मदत करत असाल तर तुम्ही खात्याला कलंक लावत आहात.
महाराष्ट्राला बेआब्रू करत आहात. तुमच्या खाली काय जळत आहे ते पाहा मिस्टर सत्यनारायण चौधरी! सरकार बदलत असतं. सरकार बदलणार आहे. या सगळ्याचा हिशोब केला जाईल.
त्यांनी यादी मागितली तर मी सत्यनारायण चौधरी ती यादी देईल. वर्षा बंगल्यावरुन कोणत्या गुंडांना काय मदत करण्याचे आदेश येत आहेत हे सत्यनारायण चौधरींइतकं कोणाला माहिती नाही?
तुम्ही कोणासाठी काम करताय? मी नावं देऊ का तुम्हाला? मला धमक्या देऊ नका. हे लोक गुंडाचं राज्य आणू इच्छितात. पोलीस गुंडांच्या मदतीने
आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतील तर महाविकास आघाडी याची गांभीर्याने नोंद घेत असल्याचं या अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो,” असं राऊत म्हणाले.
राऊत यांना पत्रकारांनी, “तुम्हालाही धमक्या आल्या का?” असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राऊत यांनी, “मी कधीही मला आलेल्या धमक्यांचा बाऊ केलेला नाही. मी गुंडांना,
ईडीला किंवा सीबीआयला घाबरत नाही. आम्ही शिवसेनेचे लोक फडणवीसांप्रमाणे फोर्स वनचे कमांडो लावत नाही. ते त्यांच्यासाठीच आहेत. तुम्ही गुंडांच्या मदतीने निवडणुका लढत आहात.
खून, खंडणी, हत्या आणि अपहरणासारखे गुन्हे आहेत. ज्यांनी दाऊद टोळीबरोबर काम करत आहेत अशा लोकांना वापरुन शिंदेंचे लोक, भाजपाचे लोक आमच्याविरुद्ध निवडणुकीला वापरणार असतील तर जे घडेल त्याची जबाबदारी पोलिसांवर असेल,” असं उत्तर दिलं.