तेलंगणा -महाराष्ट्र सीमेवर अवजड वाहनांना बंदी ,४८ तासांपासून वाहतूक बंद
Heavy vehicles banned on Telangana-Maharashtra border, traffic closed for 48 hours

तेलंगणा प्रशासनाने महाराष्ट्रातून येणाऱ्या अवजड वाहनांना अटकाव केला आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.
महाराष्ट्रातून तेलंगणा राज्यात होणाऱ्या जड वाहतूकीमुळे मार्गाचे नुकसान होत असल्याचा ठपका ठेवीत तेलंगणा प्रशासनाने दोन राज्याला जोडणाऱ्या पुलावरील वाहतूकीला रोख लावला आहे.
एवढंच नव्हे तर महाराष्ट्र राज्यातील सीमेत येऊन तेलंगणा पोलीस वाहनांवर कारवाई करीत आहेत. या प्रकाराने महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या पोडसा या गावातील गावकरी चांगलेच संतापाले आहेत.
या प्रकारामुळे मागील ४८ तासांपासून दोन राज्याला जोडणाऱ्या पोडासा पुलावर वाहतूक खोडंबली आहे. पुलावर ट्रकच्या रांगच रांग दिसत आहेत.महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या पोडसा गावाला लागून वर्धा नदीचे पात्र आहे.
वर्धा नदीच्या पात्राने महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याला विभागले आहे. या नदी पात्रावर दहा वर्षांपूर्वी पुलाची निर्मिती झाली. त्यामुळे दोन्ही राज्यांतील वाहतूक सुरु झाली.
त्यामुळे महाराष्ट्र-तेलंगणा राज्याचे सबंध अधिक दृढ झाल्याचे बोलले जात होते. मात्र तेलंगणा प्रशासनाच्या एका कृतीने या संबंधाला तडा जाण्याची भीती आता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रातून होणाऱ्या वाहतुकीमुळे तेलंगणा राज्यातील मार्गांचे नुकसान होत असल्याचा जावई शोध तेलंगणा प्रशासनाने काढला. आणि त्यांनी थेट महाराष्ट्र राज्याच्या सीमेत पोलिसांना पाठवून वाहतूक बंद केली.
यामुळे सीमावरती भागातील नागरिक चांगलेच संतापले आहेत. यासंदर्भात तेलंगणा राज्यातील शिरपूर पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराशी संपर्क साधला असता ते म्हणाले,
टोल टॅक्स वाचविण्यासाठी पोडसा-सिरपूर मार्गाचा वापर केला जात आहे. या मार्गाने होणाऱ्या जडवाहतुकीमुळे मार्गाचे नुकसान होत असून गावकऱ्यांनाही त्रास सहन करावा लागात आहे.
दरम्यान, तेलंगणा पोलिसांनी कोणतीही पूर्वसुचना न देता हा घाट घातल्याचे बोलले जात आहे. पोलिसांकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून
उडवा उडवीची उत्तरे मिळत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. गेल्या ४८ तासांपासून वाहनांच्या रांगेत अडकलेल्या अवजड वाहनांच्या ड्रायवरांचे अन्न पाण्यावाचून हाल होत आहेत.