मोदींच्या माफीवर राहुल गांधींचे तीन प्रश्न
Three questions from Rahul Gandhi on Modi's apology

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले आणि माफी मागून गेले. आपल्या हातून चूक होते, तेव्हाच माफी मागितली जाते. म्हणजे मोदींना चूक झाल्याचं मान्य आहे का?,
असा सवाल काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी विचारला. मोदींनी माफी नेमकी कशाबद्दल मागितली? संघाच्या माणसाला अनुभन नसतानाही
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम दिलं त्याबद्दल मोदींनी माफी मागितली की पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाला,
त्याबद्दल मोदींनी क्षमा मागितली, असे प्रश्न राहुल यांनी सांगलीतील सभेत विचारले. काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आज संपन्न झालं.
सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यांत कोसळला. त्यावरुन राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.
शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण मोदींच्याच हस्ते झाला. पुतळा कोसळल्यानंतर राज्य सरकारवर टीकेची झोड उठली. त्यानंतर महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या मोदींनी माफी मागितली. तोच धागा पकडत राहुल गांधी मोदींवर तुटून पडले.
‘मी शिवाजी महाराजांची माफी मागतो, असं मोदी म्हणाल्याचं माझ्या वाचनात आलं. त्यांनी माफी नेमकी का मागितली? त्यामागची कारणं काय?
ती वेगवेगळी असू शकतात. संघाच्या माणसाला कंत्राट दिलं म्हणून त्यांनी माफी मागितली का? कंत्राट मेरिटवर द्यायला हवं असं त्यांना वाटत असेल.
दुसरा मुद्दा भ्रष्टाचार, चोरीचा असू शकतो. त्यामुळे त्यांनी माफी मागितली असेल. ज्याला कंत्राट दिलं, त्यानं भ्रष्टाचार केला, याबद्दल मोदींनी माफी मागितली का? तिसरा मुद्दा हलगर्जीपणाचा असू शकतो.
छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषाची मूर्ती उभारताना इतकीही काळजी घेतली गेली नाही की ती उभी राहील? कदाचित
या भावनेतून मोदींनी माफी मागितली असेल, अशा शब्दांत राहुल गांधींनी माफीबद्दल तीन प्रश्न विचारले.
राहुल गांधी महाराष्ट्रात, नांदेडमध्ये दिवंगत वसंत चव्हाण यांच्या कुटुंबियांची भेट
छत्रपती शिवरायांचा पुतळा भ्रष्टाचारामुळे पडतो. या सरकारनं शिवरायांचा अपमान केला आहे. त्यामुळे मोदींनी केवळ शिवरायांची नव्हे, तर महाराष्ट्रातील प्रत्येकाची माफी मागावी,
अशी मागणी राहुल यांनी केली. मोदी नेमकी कशा कशाबद्दल माफी मागणार आहेत? देशातील सगळी कंत्राटं ते केवळ दोन माणसांनाच देतात.
त्याबद्दल ते माफी मागणार का? शेतकऱ्यांसाठी काळे कायदे आणले. त्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांपैकी ७०० जणांचा जीव गेला.
त्याबद्दल मोदी माफी मागणार का? नोटबंदी, चुकीच्या जीएसटीमुळे छोटे, मध्यम उद्योग उद्ध्वस्त झाले. अनेकांचा रोजगार गेला. त्याबद्दल मोदी माफी मागणार का, अशी प्रश्नांची सरबत्तीच राहुल यांनी केली.