अजितदादांनी सांगितले लोकसभेत महायुतीच्या अपयशाचे कारण
Ajit Dada told the reason for the failure of the Grand Alliance in the Lok Sabha

महायुतीने विधानसभेसाठी मशागत करायला सुरुवात केली आहे. पावसाळी अधिवेशनातील बजेटमधून त्याची झलक सर्वांना दिसली.
आता तीनही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी महायुतीने रणशिंग फुंकले आहे. त्यात विधानसभेसाठी हुंकार भरण्यात आला आहे.
पण त्याअगोदर लोकसभेतील हाराकिरीचे विश्लेषण, मंथन पण करण्यात आले. पराभवाला नेमकं कारणं कोणती याचा माग काढण्यात आला. अजित पवार यांनी पुढे जाताना लोकसभेसाठी कशात कमी पडलो, याची उजळणी केली.
मुंबईतील सायन येथील षण्मुखानंद सभागृहात महायुतीचा मेळावा झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना,
अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप या तीनही पक्षाचे पदाधिकारी एकत्रित या मेळाव्याला हजर होते. त्यावेळी अजितदादांनी तडाखेबंद भाषण केले.
लोकहिताचे निर्णय मार्गी लावण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीने सहकाऱ्यांनी केला. लोकहिताला प्राधान्य देण्यात आलं.
शाश्वत विकासाचे काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तरीही राज्यात महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही, असे अजितदादा म्हणाले. त्यांनी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाल्याबदद्ल अभिनंदन केले.
लोकसभेतील पराभवाचे खापर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर फोडले होते. त्यांनी संविधान आणि इतर गोष्टींचा गैरसमज पसरवल्याने महायुतीचा पराभव झाल्याचे बोलले जात होते.
पण अजितदादांनी महायुतीला पण आत्मचिंतन करायला लावले. त्यांनी महायुतीचा पराभव कशामुळे झाला, याचे झणझणीत अंजनच महायुतीच्या डोळ्यात घातले.
विभागनिहाय, जिल्हानिहाय, तालुकानिहाय समन्वय साधण्याचं ठरवलं होतं प ते झालं नाही. महायुतीत समन्वय राखण्यात अपयश आल्याची अजित पवारांची जाहीर कबुली अजितदादांनी या मेळाव्यात बोलताना दिली.
विरोधकांनी पसरविलेला गैरसमज हाणून पाडण्याचं काम आपण केलं पाहिजे. आता समन्वय राखण्यासाठी लगेच कामाला लागू, असे आवाहन अजितदादांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले. विधानसभेपूर्वी चुका दुरुस्त करण्याचे मोठे काम महायुतीला करावे लागणार असल्याचे संकेतच जणू त्यांनी दिले.