लाडक्या बहिणींना 3,000 रुपये महिना,एसटी बस मोफत
Dear sisters Rs. 3,000per month, ST bus free

महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर आता महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या योजनेचं वचन देण्यात आलं आहे.
महाविकास आघाडीने आज चार मोठे आश्वासन दिले आहेत. यापैकी महालक्ष्मी योजनेचं वचन महाविकास आघाडीकडून देण्यात आलं आहे.
महाविकास आघाडीच्या या 4 मोठ्या घोषणांमुळे आता विधानसभेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. मविआची आज मुंबईतील बीकेसी येथे सभा पार पडली.
या सभेला राज्यातील मविआच्या प्रमुख नेत्यांसह काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील उपस्थिती लावली. यावेळी राहुल गांधी यांनी राज्यातील जनेतेने
मविआ सरकारला निवडून दिलं तर मविआ सरकार राज्यातील महिलांना महिन्याला 3 हजार रुपये खटाखट खटाखट देणार, असं वचन राहुल गांधी यांनी दिलं.
“एकीकडे अब्जाधीशांचं सरकार आणि दुसरीकडे गरीब आणि शेतकऱ्यांचं सरकार आहे. त्यामुळे इंडिया आघाडीने महाराष्ट्रातील जनतेला पाच गॅरंटी दिल्या आहेत.
आज मला सांगितलं की या गॅरंटी पैकी पहिली गॅरंटी सांगावी. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि मल्लिकार्जुन खर्गे इतर गॅरंटीबद्दल सांगणार आहे.
आम्ही महालक्ष्मी योजना आणणार आहोत. ३ हजार रुपये देणार. दर महिन्याला देणार आहोत. इंडिया आघाडीचं सरकार अकाऊंटमध्ये हे पैसे देणार आहे. महाराष्ट्रातील महिलांना ३ हजार रुपये खटाखटा खटाखट देणार आहोत”, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.
“महाराष्ट्रातील महिला बसमधून कुठे जाईल तेव्हा त्यांना बस तिकीट खरेदी करण्यासाठी पैसे देण्याची गरज नाही. फ्रिमध्ये जाईल. कारण ज्या भाजप सरकारने महागाई दिली, गॅस सिलिंडरची वाढवलंय. त्याचं सर्वाधिक वेदना महाराष्ट्रातील महिलांना होत आहे”, असं राहुल गांधी म्हणाले.
“देशात जाती जनगणना केली पाहिजे. सत्तेत आपला किती सहभाग आहे, संस्था कुणाच्या ताब्यात आहेत आणि संपत्ती कुणाच्या हाती आहेत, हे लोकांना कळलं पाहिजे.
त्यासाठी आम्ही जाती जनगणनेची मागणी केली आहे. कर्नाटक आणि तेलंगनात आमचं सरकार आहे. आम्ही तिथे जाती जनगणना करण्यास सुरुवात केली आहे.
पूर्वी सर्व्हे घरात बसून व्हायचे. सवाल अधिकारी तयार करायचे. पण पहिल्यांदाच सर्वेचे प्रश्न आम्ही जनतेकडून मागवले. लोकांशी मिटिंग केली.
सवाल आले आणि तेच प्रश्न तेलंगनात विचारले जाणार आहे. असं करणारं तेलंगना हे पहिलं राज्य आहे. महाराष्ट्रात आमचं सरकार येताच जाती जनगणनेचं काम सुरू करणार आहे”, असं राहुल गांधी यांनी सांगितलं.
“दिल्लीत इंडिया आघाडीचं सरकार आलं तर आम्ही जाती जनगणना करू आणि आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा तोडू. ही विचारधारेची लढाई आहे. संविधान संपलं तर दलित,
आदिवासी आणि ओबीसींकडे काहीच राहणार नाही. जे काही तुम्हाला मिळालं, आयआयटी, आयआयएम, शिक्षण, आरोग्य सेवा, तुमच्या जमिनीचे संरक्षण संविधान करत आहे.
जर अदानीवर थोडीसे निर्बंध आहे ते फक्त संविधानामुळेच आहे. हे पुस्तक केवळ एक पुस्तक नाही. त्यात महापुरुषांचे विचार आहे. भारतीयांचा आवाज हे पुस्तक आहे.
यात आंबेडकर, फुले आणि गांधींचा आवाज आहे. नारायण गुरू, बुद्ध, बसवन्नाचा आवाज आहे. भारतीयांचा आवाज, गरीबांचा आवाज, ओबीसींचा आवाज आणि शेतकऱ्यांचा आवाज यात आहे.
भाजप आणि संघ हळूहळू हा आवाज खत्म करू पाहत आहे. काहीही झालं तरी संविधानाला कुणीही हात लावू शकत नाही. इंडिया आघाडी आणि भारतीय जनता एकसाथ उभी आहे. आम्ही संविधान कधीच संपू देणार नाही”, असं राहुल गांधी म्हणाले.