काँग्रेस पक्षाकडून उमेदवार फायनल करण्यापूर्वी दिल्लीत मंथन
Congress party brainstorms in Delhi before finalizing candidates

आज राज्याची विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस नेत्यांची दिल्लीत महत्वाची बैठक होत आहे.
बैठकीसाठी काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. राज्यातील काँग्रेसचे प्रमुख 6 नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा करणार आहेत.
महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथल्ला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, वर्षा गायकवाड बैठकीसाठी उपस्थित आहेत.
हरियाणा राज्यानंतर राहुल गांधी महाराष्ट्राचा देखील आढावा घेणार आहेत. विधानसभेच्या जागावाटप बाबत देखील बैठकीत चर्चा होणार आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. राहुल गांधी यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. काँग्रेसच्या या बैठकीसाठी नाना पटोले,
पृथ्वीराज चव्हाण, रमेश चेन्नीथला दिल्लीत दाखल झाले आहेत. विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, बाळासाहेब थोरात देखील दाखल झाले आहेत.
आज विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप महाविकास आघाडीतील काही जागांचा तिढा सुटलेला नाही.
त्यामुळे आजच्या काँग्रेसच्या बैठकीत यावर चर्चा होणार आहे. सोबतच निवडणुकीच्या प्रचार रणनितीबाबत देखील बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या बैठकीआधी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केलं आहे. मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थित आमची बैठक होत आहे. महाविकास आघाडीचं सव्वा दोनशे जागा वाटप झालं आहे.
या सरकारने 200 हून अधिक जीआर काढले. महामंडळ जाहीर झाले मात्र सरकारकडे पैसा नाही. कॉंग्रेसमध्ये समन्वय आहे. हे सरकार असंवैधानिक आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री येत्या काळात होणार आहे, असं पटोले म्हणाले.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही या बैठकीआधी आज वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला बोलावलं आहे. जाहीरनामा बाबत चर्चा होऊ शकते. आम्ही एकत्र निवडणुकीला पुढे जात आहोत.
आमच्या आघाडीचा राज्यात विजय होईल. महायुती, भ्रष्ट युती गेली पाहिजे हे आम्ही पाहत आहोत. राज्यात आमचं सरकार येणार आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा करण्याची आता आवश्यकता नाही, थोरात म्हणाले.