अजित पवारांना भाजप देतेय फक्त ४ जागा;पवार नाराज
BJP is giving only 4 seats to Ajit Pawar; Pawar is upset
लोकसभा निवडणुकीसाठी सगळ्याच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. महायुतीत जागावाटपाचं गुऱ्हाळ सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवस महाराष्ट्रात होते.
त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री बंगल्यार भेट घेतली. शहांनी शिवसेनेला ९ आणि राष्ट्रवादीला ४ जागा देऊ केल्या. तर भाजपनं ३५ जागांवर लढण्याची तयारी सुरू केली आहे.
राष्ट्रवादीनं एकूण १६ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. यातील ३ जागांचा अहवाल भाजपला देण्यात आला. पण भाजपनं थेट ४ जागांची ऑफर दिल्यानं राष्ट्रवादीत नाराजी आहे.
इतक्या कमी जागांवर लढण्याची राष्ट्रवादीची नाराजी नाही. शहांसोबतच्या बैठकीत अजित पवारांनी ९ जागा मागितल्या. पण मित्रपक्षांना अधिक जागा सोडण्याची भाजपची तयारी नाही.
लोकसभा निवडणुकीला आम्हाला अधिक जागा लढू द्या. भाजपनं लोकसभेला अधिकाधिक जागा जिंकणं महत्त्वाचं आहे. लोकसभा निवडणुकीत होणारं तुमचं नुकसान विधानसभा निवडणुकीत भरुन देऊ,
असा शब्द अमित शहांनी सह्याद्रीवर झालेल्या बैठकीत दिला. शिंदेंच्या शिवसेनेला जितक्या जागा दिल्या जातील, तितक्याच आम्हाला मिळाव्यात, असा राष्ट्रवादीचा आग्रह आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी काल हीच भूमिका मांडली.
सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत अमित शहांनी अजित पवारांची नाराजी दूर करण्यासाठी एक खास ऑफर दिल्याची माहिती सुत्रांनी दिली.
‘आता शिंदेंना तुमच्यापेक्षा अधिक जागा लढू द्या. त्यांचे खासदार अधिक आहेत. लोकसभेला त्यांना जास्त जागांवर निवडणूक लढवू दे.
आता ते मोठा भाऊ आहेत. विधानसभेला तुम्हाला मोठा भाऊ करतो. त्या निवडणुकीत तुम्हाला अधिक जागा देऊ,’ अशी ऑफर शहांनी अजित पवारांना दिल्याचं वृत्त आहे.
लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबद्दल चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार उद्या दिल्लीला जाणार आहेत.
ते भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वासोबत जागावाटपाविषयी चर्चा करतील. कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेदेखील त्यांच्या सोबत असतील. या बैठकीत जागावाटपाचं अंतिम सूत्र तयार होईल अशी शक्यता आहे.
दरम्यान भाजपच्या दिल्लीतील बैठकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील,
आशिष शेलार यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी मित्र पक्षांच्या एक आकडी उमेदवारीबाबत भाष्य केलं.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एक अंकी जागा मिळताली, अशा बातम्या बुधवारी सकाळीपासूनच काही माध्यमांनी प्रसारित केल्या होत्या.
त्यावरुन फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली आहे. मीडियाने स्वतःहून असं ठरवणं आणि धादांत चुकीच्या बातम्या देणं चुकीचं असल्याचं फडणवीस म्हणाले.
भाजपने पहिल्या यादीमध्ये ज्या जागा जाहीर केल्या आहेत तिथे भाजप स्वतंत्र आहे. इतर ठिकाणी भाजप अलायन्समध्ये असल्याने त्यावर चर्चा सुरु आहेत. त्यानंतर जागावाटप जाहीर केलं जाईल.
प्रत्येक राज्यासोबत केंद्रीय नेतृत्वाकडून चर्चा केली जात आहे. आज महाराष्ट्रातील आम्ही नेते चर्चेसाठी आलेलो असून युतीमध्ये असलेल्या राज्यांची यादी लवकरच देणार आहोत.
मित्र पक्षांना एक डिजिट जागा मिळतील, असं सांगणं म्हणजे पतंगबाजी आहे. अशा प्रकारे बतावण्या करणं योग्य नाही. आमच्या दोन्ही साथीदारांना योग्य तो सन्मान देऊन जागा दिल्या जातील.









