महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत हेराफेरीवरून राहुल गांधी लोकसभेत आक्रमक
Rigged assembly elections in Maharashtra, Rahul Gandhi aggressive in Lok Sabha
विरोधी पक्षनेते राहुल गांधीहे आज लोकसभेत चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर संसदेत गंभीर आरोप केले आहेत.
लोकसभा निवडणुका आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांदरम्यान काही महिन्यांत राज्यातील मतदारांची संख्या हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येइतकी वाढल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक ते विधानसभा निवडणुकीदरम्यान हिमाचल प्रदेशातील लोकसंख्येइतकी लोकसंख्या काही महिन्यातच अचानक कोठून आली? असा सवाल करत राहुल गांधी यांनी थेट भाजपवर निशाणा साधला.
निवडणूक आयोगाने मतदार यादीशी संबंधित डेटा राज्यातील विरोधी पक्षांना उपलब्ध करुन द्यावा असेही ते म्हणाले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर
आणलेल्या आभारप्रदर्शनावरील चर्चेत राहुल गांधी यांनी भाग घेतला, त्यावेली बोलत होते. मी आरोप करत नाही, मात्र आयोगाने यावर प्रतिक्रिया द्यावी असे गांधी म्हणाले.
मला या सभागृहाचे लक्ष महाराष्ट्राच्या निवडणुकीशी संबंधित काही आकडेवारीकडे वेधायचे आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान, हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येइतके लोक महाराष्ट्राच्या मतदान यादीत समाविष्ट झाले आहेत.
जवळपास 70 लाख नवीन मतदारा अचानक वाढल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात पाच वर्षांत जेवढे मतदार जोडले गेले त्यापेक्षा पाच महिन्यांत जास्त मतदार जोडले गेले आहेत.
यावेळी त्यांनी शिर्डीचे उदाहरण दिले. शिर्डीमध्ये एका ठिकाणी 7000 मतदार वाढले आहेत. विशेष म्हणजे नवीन मतदार हे भाजपला ज्या ठिकाणी आघाडी मिळाली आहे, त्या ठिकाणी जोडण्यात आले आहेत असं राहुल गांधी म्हणाले.
मी आरोप करत नाही, मी फक्त असे म्हणत आहे की निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील निवडणुकीची आकडेवारी काँग्रेस, शिवसेना (यूबीटी) आणि राष्ट्रवादी (एसपी) यांना द्यावी असेही राहुल गांधी म्हणाले.
यापूर्वी काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मतदारांची संख्या वाढल्याबाबत निवडणूक आयोगाकडे उत्तरे मागितली होती.
पाच महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्रात 50 लाखांहून अधिक मतदारांमध्ये आश्चर्यकारक वाढ झाल्याचा दावा काँग्रेसने यापूर्वी केला होता.
दरम्यान, निवडणूक आयोगाने डिसेंबरमध्ये सांगितले होते की, राज्यातील मतदारांची नावे अनियंत्रितपणे जोडली किंवा काढली गेली नाहीत.
नोव्हेंबर २० रोजी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या महाविकास आघाडीला २८८ पैकी अवघ्या ५० जागा जिंकता आल्या होत्या.
ज्यामध्ये शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने २० जागा, काँग्रेस १६ जागा आणि राष्ट्रवादी (शरद पवार) १० जागा जिंकल्या होत्या, तर एक जागा अपक्ष आणि एक एआएमआयएमने जिंकली होती.
तर महायुतीला या निवडणुकीत २३५ जागांवर विजय मिळाला होता, ज्यामध्ये १३२ जागा भाजपाने, ५७ शिवसेना (शिंदे), ४१ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि ५ जागा इतरांनी जिंकल्या होत्या.