भुजबळांना मंत्रिपद ;धनंजय मुंडे नाराज, अजित पवार फडणवीसांच्या भेटीला
Bhujbal gets ministerial berth; Dhananjay Munde upset, Ajit Pawar meets Fadnavis

ओबीसींचा राजकीय चेहरा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
१९९१ पासून मंत्री म्हणून शपथ घेण्याची भुजबळ यांची आजची नववी वेळ आहे. ‘राष्ट्रवादी’च्या कोट्यातून भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळातील पुनरागमनाचा मार्ग अवघड बनला आहे.
या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे कमालीचे नाराज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली असून या नाराजीच्या पार्श्वभूमीवरच काल रात्री उशिरा अजित पवार हे धनंजय मुंडेंना घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या बंगल्यावर गेल्याची माहिती माहिती समोर आली आहे.
छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे धनंजय मुंडे हे सरकारच्या या टर्ममध्ये तरी मंत्रिमंडळात पुन्हा येऊ शकतील की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात निकटवर्तीयांचा सहभाग आढळून आल्याने निर्माण झालेल्या जनआक्रोशामुळे धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून दूर व्हावं लागलं होतं.
परंतु वातावरण निवळल्यानंतर पुन्हा आपले कमबॅक होईल, अशी आशा मुंडे यांना होती. मात्र त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर आता छगन भुजबळ यांना संधी देण्यात आल्याने राष्ट्रवादीचा मंत्रिपदाचा कोटा पूर्ण झाला आहे.
त्यामुळे मुंडे यांच्या परतीचा मार्ग आणखीनच खडतर झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच धनंजय मुंडे यांची समजूत काढण्यासाठी आणि त्यांना राजकीय भवितव्याविषयी आश्वस्त करण्यासाठी अजित पवार हे मुंडे यांना घेऊन काल रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर गेल्याचे समजते.
या भेटीत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा करत त्यांच्या पुनर्वसनाविषयी शब्द दिला असण्याची शक्यता आहे. याबाबत एका मराठी दैनिकाने वृत्त दिले आहे.
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात डावलल्यानंतर पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच अंगावर घेणाऱ्या छगन भुजबळांना अखेर सबुरी सल्ला पावला आहे.
भुजबळांचे सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मंत्रिमंडळात जोरदार कमबॅक केले आहे. भुजबळांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे नाशिकने मंत्रिमंडळात चौकार मारला आहे. भुजबळांची राजकीय कारकीर्द संपल्याचा दावा करणाऱ्या विरोधकांनाही भुजबळांनी चपराक लगावली.
आक्रमक आणि ओबीसी नेता अशी ओळख असलेल्या भुजबळाच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे महायुती सरकार स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत विधानसभेप्रमाणेच चांगली कामगिरी करील, अशी अपेक्षा राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे.
मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने भुजबळांनी थेट राष्ट्रवादी सोडण्याची तयारीही केली होती; परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह राष्ट्रवादीतल्या सहकाऱ्यांनी भुजबळांना सबुरीचा सल्ला दिला होता.
त्यामुळे भुजबळांनीही हा सल्ला शिरसावंद्य मानून झाले गेले विसरून जाऊन ‘राष्ट्रवादी’त शांत राहण्याचे धोरण स्वीकारले. भुजबळांच्या या सबुरीच्या धोरणाला सहा महिन्यानंतर फळ आले आहे.
बीडमधील धनंजय देशमुख हत्याप्रकरणात राजीनामा द्यावा लागलेल्या धनंजय मुंडेंच्या रिक्त जागेवर अखेर भुजबळांची वर्णी लागली आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सात आमदार असून, त्यांना तीन मंत्रिपदे आहेत, तर शिंदे गटाचे दोन आमदार असून एक मंत्रिपद आहे. परंतु, भाजपचे पाच आमदार असताना भाजपच्या वाटेला एकही मंत्रिपद नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.