……आणि अनिल देशमुखांचं नाव मंत्रिपदाच्या यादीतून वगळलं”, अजित पवारांचा मोठा दावा
......and Anil Deshmukh's name dropped from the ministerial list”, Ajit Pawar's big claim

शरद पवार यांना राजकारणातून घरी बसवण्यासाठी अजित पवार यांना भाजपानं सुपारी दिली आहे. त्यापद्धतीनं अजित पवार काम करत आहेत, असं विधान माजी मंत्री, अनिल देशमुख यांनी केलं होतं.
आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत देशमुखांबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. मंत्रीपद न मिळाल्यानं देशमुख आमच्याबरोबर आले नाहीत, असा दावा अजित पवारांनी केला आहे. ते कर्जतमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
अजित पवार म्हणाले, “अनिल देशमुख माझ्याबरोबर सर्व बैठकांना उपस्थित होते. ‘मला मंत्रीमंडळात स्थान मिळालं पाहिजे,’ असं देशमुखांनी म्हटलं होतं.
पण, भाजपाकडून सांगण्यात आलं की, ‘आम्ही देशमुखांवर सभागृहात आरोप केले आहेत. लगेच मंत्रीमंडळात त्यांना स्थान दिलं, तर आमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होईल, त्यामुळे अनिल देशमुखांना घेता येणार नाही.’”
“मग, मंत्रीपदाच्या यादीतून देशमुखांचं नाव वगळलं गेलं. त्यावर देशमुखांनी सांगितलं, ‘मला मंत्रीपद नाही तर मी तुमच्याबरोबर येणार नाही.’ ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे,” असं अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं.
बारामतीत सुप्रिया सुळेंच्या विरोधात उमेदवार देणार का? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, “मी बारामती, रायगड, सातारा, शिरूर येथे उमेदवार दिल्यावर,
बाकीचे कोण काय करणार? याचं मी काय सांगू. चारही ठिकाणी उमेदवार दिले जातील. ते निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं जाईल.”
दरम्यान २०१९ साली ‘प्रदेशाध्यक्ष’ पदावरून जयंत पाटलांनी प्रकाश सोळंके यांना शब्द दिला होता. पण, तो शब्द जयंत पाटील यांनी पाळला नाही, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला आहे. तसेच, दहा वेळा विचार करून शब्द द्या, असंही अजित पवारांनी जयंत पाटलांना सुनावलं आहे.
रायगडमधील कर्जत येथे अजित पवार गटाचं वैचारिक मंथन शिबिर आयोजित केलं आहे. यावेळी संवाद साधताना अजित पवार म्हणाले, “मी प्रदेशाध्यक्ष झालो नसलो, तरी संघटनेचं काम कोण करत होतं, हे सगळ्यांना माहिती आहे. मी विरोधी पक्षनेते पद सोडून संघटनेची जबाबदारी देण्याची मागणी केली होती. कुठलीही चुकीची गोष्ट केली नाही.”
“२०१९ साली देवेंद्र फडणवीसांबरोबर सरकार स्थापन केलं. तेव्हा, प्रकाश सोळंके नाराज झाले. सोळंकेंना मंत्रीमंडळात यायचं होतं. अशोक डक, मी, प्रकाश सोळंके आणि जयंत पाटील, काही वेळेला धनंजय मुंडे अशा आमच्या बैठका व्हायच्या. प्रकाश सोळंकेंनी राजीनामा द्यायची तयारी केली होती.
त्यांचं मत होतं की, ‘मी पक्षासाठी काय कमी केलं? मलाही मंत्रीपद मिळालं पाहिजे.’ मात्र, सोळंकेंनी केलेली मागणी रास्त होती. शेवटी मी आणि जयंत पाटलांनी त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी सोळंकेंना आम्ही कार्याध्यक्षपदाचा शब्द दिला,” असं अजित पवारांनी सांगितलं.
“जयंत पाटलांनी म्हटलं, ‘मी एक वर्ष अध्यक्ष राहतो, एक वर्षानंतर तुम्ही कार्याध्यक्षाचं प्रदेशाध्यक्ष व्हा.’ तेव्हा प्रकाश सोळंकेंनी मान्य केलं. वर्षभरानंतर मी जयंत पाटलांना विचारलं, आपण सोळंकेंना शब्द दिलाय.
यावर जयंत पाटलांनी सांगितलं, ‘हे खरंय, पण वरिष्ठ म्हणतात, तूच प्रदेशाध्यक्ष राहा.’ मी म्हणालो, वरिष्ठांना सांगा, मला जलसंपदा विभागातून वेळ मिळत नाही. मात्र, पुढं ढकलत, ढकलत अजून चाललंच आहे. हे बरोबर नाही,” अशी नाराजी अजित पवारांनी व्यक्त केली.
“एकदा तुम्ही शब्द दिला, एखादा महिना पुढे-मागे चालेल. शब्द देताना दहा वेळा विचार करू शब्द द्या. कार्यकर्त्यांना नाराज करायचं, मला अजिबात आवडत नाही. पण, छोट्या-छोट्या गोष्टी साठत जातात,” असं अजित पवारांनी सांगितलं.