शरद पवारांनी दिले राजकारणातून निवृत्तीचे संकेत

Sharad Pawar signaled his retirement from politics

 

 

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत उलटल्यानंतर आता राज्यभरातल्या लढतींचं चित्र स्पष्ट होऊ लागलं आहे.

 

अनेक ठिकाणी बंडखोरांनी मोठं आव्हान उभं केलं आहे. एकीकडे ही चर्चा असताना दुसरीकडे आता शरद पवारांच्या राजकीय निवृत्तीची चर्चा होऊ लागली आहे.

 

खुद्द त्यांनीच बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्या प्रचारसभेमध्ये केलेल्या भाषणात तसेच संकेत दिले आहेत. मात्र, राजकारणातून निवृत्त झाल्यानंतरही सामाजिक कार्य करत राहणार असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत.

 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्याच्या अवघ्या महिनाभर आधी शरद पवारांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेतेमंडळी व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी तो मागे घेतला.

 

त्यानंतर लगेचच पक्षात फूट पडली व अजित पवार गट सत्ताधारी महायुतीमध्ये सामील झाला. तेव्हाही शरद पवारांच्या राजीनाम्याची

 

जोरदार चर्चा पाहायला मिळाली होती. आता शरद पवारांनी राजकीय निवृत्ती घेण्याचेच थेट संकेत दिल्यामुळे राजकीय वर्तुळात त्याची चर्चा होऊ लागली आहे.

 

शरद पवारांनी बारामतीमध्ये आज युगेंद्र पवारांच्या प्रचारासाठी सभा घेतली. यावेळी गेल्या ५५ वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सक्रिय असल्याचं नमूद करत त्यांनी निवृत्तीचे संकेत दिले.

 

“तुमच्यातले काही लोक त्या वेळी हयात होते, काहींचा जन्म झाला नव्हता. ५५ वर्षांपूर्वी मी महाराष्ट्राच्या सगळ्या भागात काम करायला सुरुवात केली. १९६७ साली त्यावेळच्या मतदारांनी मला निवडून दिलं.

 

त्यातले काही मतदार मला अजूनही इथे दिसत आहेत. त्याला आता ५०-५५ वर्षं होऊन गेली. मी सगळ्यांच्या पाठिंब्यानं विधानसभेत गेलो, राज्यमंत्री झालो,

 

मंत्री झालो, मुख्यमंत्री झालो, संरक्षण खात्याचं काम केलं, शेती खात्याचं काम केलं आणि आज मी राज्यसभेत आहे”, असं शरद पवार म्हणाले.

 

“लोकसभेत एकदा तुमच्या मतांवर निवडून गेलो आणि नंतर ठरवलं की आता लोकसभा नाही. कारण ३०-३५ वर्षं सतत निवडून गेल्यानंतर नवी पिढी तयार करायला पाहिजे.

 

त्यामुळे ३० वर्षांपूर्वी मी निर्णय घेतला की आता मी लोकसभेला उभा राहणार नाही. इथलं राजकारण मी बघणार नाही. ही सगळी जबाबदारी अजित पवारांकडे देईन.

 

जवळपास गेली २५-३० वर्षं ही जबाबदारी त्यांच्यावर आहे. पहिली ३० वर्षं माझ्यावर, माझ्यानंतर ३० वर्षं अजित पवारांवर. आता पुढच्या ३० वर्षांची व्यवस्था करण्याची गरज आहे.

 

ती करायची असेल तर लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यात लक्ष घालण्याची दृष्टी हवी”, असं म्हणत शरद पवारांनी युगेंद्र पवारांच्या हाती बारामतीची सूत्रं सोपवत असल्याचं नमूद केलं.

 

“मी आत्ता राज्यसभेत आहे. अजून दीड वर्षं टर्म आहे. त्यानंतर पुन्हा राज्यसभेत जायचं की नाही याचाही विचार मला करावा लागेल. लोकसभा मी लढवणार नाही. कोणतीच निवडणूक लढवणार नाही.

 

किती निवडणुका लढवायच्या? आत्तापर्यंत १४ निवडणुका लढवल्या. आणि तुम्ही असले लोक आहात की एकदाही घरी पाठवलं नाही.

 

दरवेळी निवडूनच देताय. पण आता कुठेतरी थांबलं पाहिजे, नवी पिढी आणली पाहिजे हे सूत्र घेऊन मी कामाला लागलोय”, अशा शब्दांत शरद पवारांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत.

 

“पण याचा अर्थ समाजकारण सोडलेलं नाही. सत्ता नको. पण लोकांची सेवा, लोकांचं काम करतच राहायचं. ज्या भागात दलित, भटके विमुक्त, उपेक्षित या वर्गासाठी जे काही करता येईल,

 

ते करायचं हा माझा स्वत:चा निर्णय आहे. निवडणूक आता आपल्याला नको हे मी ठरवलं आहे. पण तसं असलं, तरी राज्य व्यवस्थित चाललं पाहिजे. त्यासाठी नवी पिढी तयार करायला पाहिजे”, असं ते म्हणाले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *