मुख्यमंत्रिपदासाठी नवीनच नाव चर्चेत ;तात्काळ रात्री थेट दिल्लीत बोलावले , राजकीय घडामोडी तीव्र
New name in discussion for the post of Chief Minister; immediately called to Delhi at night, political developments intensify

राज्यातील नव्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार असून यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
राज्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हा फॉर्म्युला राहणार असून मुख्यमंत्रिपद भाजपकडे असणार आहे, हे जवळपास निश्चित झाले आहे.
तसेच मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढे असताना काल रात्री (30 नोव्हेंबर) दिल्लीत पुन्हा राजकीय घडामोड घडल्याचे समोर आले आहे.
दिल्लीत काल रात्री (30 नोव्हेंबर) जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी विनोद तावडे आणि जे.पी. नड्डा यांच्यात जवळपास एक तास बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच विनोद तावडे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात देखील मुख्यमंत्रिपदावरुन पुन्हा चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी भाजपचे आमदार आणि देवेंद्र फडणवीस यांचे
निकटवर्तीय समजले जाणारे रवींद्र चव्हाण यांना देखील अचानक दिल्लीत बोलावून घेतले. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठांच्या मनात नेमकं काय सुरुय, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याची प्रतीक्षा राज्याला असताना देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आमदार रवींद्र चव्हाण यांना देवेंद्र फडणवीस यांनीच गुरुवारी दिल्लीत बोलावून घेतले होते.
पालघर दौरा अर्धवट सोडून रवींद्र चव्हाण दिल्लीत गेले. भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासोबत अमित शाह यांची बैठक झाल्यानंतर बिगर मराठा मुख्यमंत्री केल्यास काय प्रतिक्रिया उमटेल,
याची चाचपणी पक्षश्रेष्ठींनी केल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाबाबत आक्षेप असेल तर रवींद्र चव्हाण यांना संधी द्यावी, अशी खेळी खेळली जाऊ शकते.
अजित पवार यांच्याच विमानाने रवींद्र चव्हाण गुरुवारी रात्री मुंबईत परत आले. शनिवारची अमावस्या संपल्यानंतर दिल्लीश्वर मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर करतील.
देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी पक्के आहेच, पण जर काही वेगळा विचार झाला तर देवेंद्र फडणवीसांकडून रवींद्र चव्हाण यांचे नाव पुढे केले जाईल असं सूत्रांच्या माहितीनूसार समोर येत आहे.
राज्यात मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार असं अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. तर गृहमंत्रिपदासंदर्भात निर्णय मुख्यमंत्री घेणार असल्याची माहिती देखील अजित पवार यांनी दिली.
दरम्यान, अमित शाह यांच्यासोबत झालेल्या दिल्लीत बैठकीत एकनाथ शिंदेच्या पक्षाकडून 12 मंत्रिपदांची अमित शाह यांच्याकडे मागणीसोबतच विधान परिषदेच्या सभापती पदाची देखील मागणी करण्यात आली.
मंत्रिपदात गृह, नगरविकास यासह महत्त्वाच्या खात्यांची मागणी एकनाथ शिंदे यांनी केली. पालकमंत्री पद देताना देखील पक्षाचा योग्य सन्मान राखावा,
अशी एकनाथ शिंदेंनी अमित शाह यांना विनंती केली. त्यामुळे गृह खातं भाजप एकनाथ शिंदेंना देणार का?, हे आगामी दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे.







