अजितदादांनी भावुक होत केली शरद पवार यांची कृतज्ञता व्यक्त
Ajit Dada got emotional and expressed his gratitude to Sharad Pawar

“सर्वांनी खांद्याला खांदा लावून हा पक्ष पुढे आणला. काही नेते आपल्यात नाहीत. शरद पवार यांचंही पक्ष स्थापनेत मोठ काम आहे. मी त्यांना ही कृतज्ञता व्यक्त करतो.
पक्ष स्थापनेवेळी सोनिया गांधी यांचा परदेशी मुद्दा काढला, मात्र त्यावेळी आपल्याला कमी वेळ निवडणुकीत मिळाला. सर्वांनी प्रयत्न केला त्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचलो.
33 टक्के जागा महिलांना होत्या, त्या आपण 50 टक्के करण्याचा निर्णय घेतला. डांन्सबार बंदी आणि गुटखा बंदीचा निर्णय आपण घेतला होता”,
असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी अजित पवार बोलत होते.
अजित पवार म्हणाले, संबंध नसताना गैरसमज पसरवण्याच काम काहीजण करत होते. दोन दिवस दिल्लीत होतो. आम्ही एकत्र जेवण केलं. काहीही वाद नव्हता.
तरीही चुकीच्या बातम्या लावल्या. देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्टीकरण दिलं. तुमची लोकसभेची एकच जागा आली आहे. तुम्हाला एक मंत्रीपद द्यायचं आहे,
असं म्हणाले होते. राज्यसभा देऊन स्वतंत्र कार्यभार दिला जाणार होता. आता दोन खासदार आहेत. जुलैपर्यंत आणखी एक खासदार वाढणार हे तुम्हाला मी आताच सांगतो, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, पक्षाच्या कार्यालयात ठराविक लोक बसली पाहिजेत. बाकी इतर लोकांनी सात दिवसात काय दौरा केला याची माहिती घ्या. मंत्र्यांनाही याच सूचना आहेत.
आपण जरी महायुतीत असलो तरी आपण फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा सोडलेली नाही. महायुतीच्या नेत्यांनाही हे आपण सांगितलं आहे. जोपर्यंत चंद्र सुर्य आहे,
तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान कोणीच मायचा लाल बदलू शकत नाही. नरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न आपले विरोधक करतील.
हे अधिवेशन झाल की जातील असं ही सांगितलं की, हे 75 वे संविधान वर्ष साजरे करण्याचे एनडीएने सांगितलं आहे. यावेळी जे अपयश मिळालं याची जबाबदारी मी घेतो, असंही अजित पवार म्हणाले.