मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? कोण-किती जागा लढवणार ,सर्व काही ठरले
Who is the chief ministerial face of Maviya? Who will fight for how many seats, everything has been decided

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ च्या निकालानंतर शिवसेना (तत्कालीन संयुक्त पक्ष) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पुढाकारातून महाराष्ट्रात महाविकास आघाडी उदयाला आली.
मात्र मविआच्या स्थापनेपासून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेस हा पक्ष महाविकास आघाडीमधला तिसरा पक्ष म्हणून ओळखला जात होता.
मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये या पक्षाचं नशीब पालटलं आहे. काँग्रेसने, त्यांच्या नेत्यांनी कल्पनाही केली नसेल इतकी मतं त्यांना लोकसभा निवडणुकीत मिळाली.
२०१९ मध्ये उपमुख्यमंत्रिपदासाठी वाटाघाटी करण्यात अपयशी ठरलेला पक्ष यंदा विधानसभा निवडणुकीत मविआमध्ये सर्वाधिक जागा लढवण्याचा प्रयत्न करत आहे. काहीच महिन्यात हा पक्ष मविआमधील ‘मोठा भाऊ’ झाला आहे.
काँग्रेसमधील सूत्रांनी दी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की त्यांनी आता मुख्यमंत्रिपदावर लक्ष केंद्रित केलं आहे. महाविकास आघाडीतील तीन पक्षांपैकी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वोत्तम कामगिरी केली आहे.
त्यांनी लोकसभेच्या १७ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी १३ जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत. तर शिवसेनेच्या ठाकरे गटाने २१ जागा लढवून नऊ जागा जिंकल्या आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने १० पैकी आठ जागा जिंकल्या आहेत.
महाराष्ट्र काँग्रेसच्या लोकसभेतील यशाचं श्रेय अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांना दिलं जात आहे. त्यांनी निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र काँग्रेसमधील नेत्यांना जबाबदाऱ्या वाटून दिल्या होत्या.
नेत्यांना ठरवून दिलेल्या क्षेत्रातच काम करण्याचा, त्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. चेन्निथला व महाराष्ट्र काँग्रेस कार्यकारिणी लोकसभेला मोठं यश मिळवण्यात यशस्वी ठरले.
पक्षाच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांना खात्री होती की लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करता आली तर विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपात त्यांना सर्वाधिक जागा मिळतील. तसेच सत्ता मिळाल्यास मुख्यमंत्रिपदावर दावा करता येईल.
पक्षातील वरिष्ठ नेते म्हणाले, काँग्रेसचा महाराष्ट्रातील पाया मजबूत आहे. त्यांच्या प्रादेशिक नेत्यांना चांगलं भविष्य आहे. ते विधानसभेला चांगली कामगिरी करू शकतात.
महाविकास आघाडीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस राज्यात ११० ते ११५ जागा लढवण्याचा विचार करत आहे. तर शिवसेनेच्या ठाकरे गटाला ९० ते ९५ जागा मिळू शकतात.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाला ८० ते ८५ जागा सोडल्या जातील. काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितलं की हायकमांड १०० पेक्षा कमी जागांवर समाधान मानणार नाही.
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस हायकमांडशी चर्चा केली. त्यावेळी ठाकरे यांनी १०० जागांसाठी आग्रह धरल्याचं सांगितलं जात आहे.
तर, काँग्रेसने मविआतील पक्षांची लोकसभेतील कामगिरी, विधानसभा मतदारसंघानुसार मिळालेल्या मतांची आकडेवारी ठाकरेंसमोर मांडली. त्या आधारावर ठाकरे गटाला १०० जागा मिळण्याची शक्यता नाही.
दुसऱ्या बाजूला, काँग्रेसने त्यांच्या दोन्ही मित्रपक्षांना सांगितलं आहे की मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निवडणुकीपूर्वी जाहीर केला जाणार नाही.
त्याचबरोबर काँग्रेस हायकमांडने राज्यातील नेतृत्वाला बजावलं आहे की तुम्ही आघाडीत सध्या तरी मोठा भाऊ म्हणून वावरू नये व मुख्यमंत्रिपदावर दावा करू नये. मात्र, राज्यातील नेत्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या पदावर दावा करणं चालू ठेवलं आहे.
अलीकडेच काँग्रेसचे विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दावा केला होता की महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल. तर नागपुरात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील असंच वक्तव्य केलं होतं.
महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे जो राज्याच्या कानाकोपऱ्यात आहे. राज्यातील बहुसंख्य मतदारसंघांमध्ये काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार काँग्रेसने प्रदेश कार्यकारिणीच्या बैठका पूर्ण केल्या असून त्यांची विधानसभा निवडणुकीची रणनिती तयार आहे. चेन्निथला व पटोले राज्यभर फिरत आहेत.
चेन्निथला यांनी अलीकडेच प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की “महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलं आहे की आता भाजपाचा पराभव करायचा आहे.
राज्यभर सरकारविरोधात संताप दिसत आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की, महाविकास आघाडी राज्यात सरकार स्थापन करेल”.