पुढील 36 तास धोक्याचे;राज्यावर अती मुसळधार पावसाचे मोठं सकंट
Farmers hit by rain; Rain forecast again

महाराष्ट्रात परतीच्या पावसानं चांगलाच जोर धरला आहे, परतीच्या पावसाचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. मात्र तरी देखील संकट काही केल्या कमी होताना दिसत नाहीये, आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात जोरदार पावासाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यामध्ये पुढील तीन दिवस म्हणजे 23 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. यादरम्यान महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण निर्माण झालं आहे.त्यामुळे पुढील तीन दिवस राज्यात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
मुंबई आणि उपनगरात आज हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून, पुढील 24 तास वातावरण ढगाळ राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना पावसाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं असून, हवामान विभागाकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांना आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट तसेच काही भागात आज गारपिटीचा देखील इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.गारपिटीचा इशारा देण्यात आल्यानं मोठं संकट यारूपानं महाराष्ट्रावर येण्याची शक्यता आहे.
कोकणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून, कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
दुसरीकडे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये देखील पुढील दोन ते तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यामध्ये मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, कोकण विभागात गेल्या एक ते दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले.
कोकणामध्ये हवामान बिघडल्यामुळे मच्छिमारी थांबली असून मच्छिमारांना आर्थिक फटका बसला आहे. पश्चिम महाराष्ट्रालाही गेल्याच आठवड्यात मुसळधार पावसाने झोडपल्याने तिथेही भात आणि सोयाबीनचे नुकसान झाले आहे.
मुसळधार पावसाने शनिवारी रात्री मराठवाड्यातील ४७ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. पावसामुळे अनेक भागांतील पिके पाण्याखाली गेली.
नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरण पुन्हा एकदा १०० टक्के भरले असून १८ दरवाजांतून ७३३६ क्युसेक वेगाने गोदावरी नदीपात्रात विसर्ग करण्यात आला.
त्यामुळे अनेक भागांतील शेतात पाणी साचल्याने जोमात आलेले पीक पाण्याखाली गेले आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत पाऊस पडल्याने काढलेले सोयाबीन,
मका या पिकांचे नुकसान होण्याचीही शक्यता आहे. तसेच कापसाचा रंगही बदलू शकतो. दोन दिवसांच्या सततच्या पावसाने नुकसानीची व्याप्ती लगेच कळणार नाही. पण नुकसान दिसू लागले असल्याचे कृषी उपसंचालक तुकाराम मोटे यांनी सांगितले.
खुलताबाद तालुक्यातील कौटगाव, संजरपूरवाडी, भोकरदन तालुक्यातील वाढोना, गोद्री, परळी वैजनाथ तालुक्यातील सेलू या गावात वीज पडून जनावरे दगावली. काही ठिकाणी भिंत पडल्याने जनावरे जखमी झाल्याचेही वृत्त आहे.
शनिवारी रात्री मुसळधार वादळी पावसाने चांदवड, देवळा, पेठ या तालुक्यांसह सिन्नर, नाशिक आणि निफाड भागास चांगलेच झोडपले.
एकट्या चांदवड तालुक्यात १६ हजार हेक्टरवरील तर चांदवडमध्ये साडेआठ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यात कांदा, द्राक्ष, मका, सोयाबीन, भाजीपाला, डाळिंबाचा समावेश आहे.
शेकडो घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले. अनेक घरांची पडझड झाली. तसेच नाशिक शहरासह कळवण, त्र्यंबकेश्वर, पेठ, सिन्नर, येवला आदी तालुक्यात अवघ्या काही तासात मुसळधार पाऊस झाला.
जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी रविवारी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन पंचनामे करण्याचे निर्देश दिले. जळगावच्या अमळनेर तालुक्यातही दोन दिवसांपासून सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले.
विदर्भाला अवकाळीचा फटका यवतमाळ, बुलढाणा, अकोला, आणि अमरावती जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. यवतमाळ जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने दाणदाण उडाली.
गेल्या २४ तासांत २३.३० मिमी पावसाची नोंद झाली असून, चार मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. बुलढाणा, अकोला आणि अमरावती जिल्ह्यांना शनिवारी अवकाळी पावसाने झोडपले. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
21 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड व धाराशिव जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात दिनांक 22 ऑक्टोबर दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात पुढील दोन दिवसात कमाल तापमानात 1 ते 2 अं.से ने वाढ होण्याची शक्यता आहे
व त्यानंतर फारशी तफावत जाणवनार नाही तर पुढील चार दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर हळूहळू घट होण्याची शक्यता आहे.
सामान्य सल्ला :
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 18 ते 24 ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा खूप जास्त व कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवऐ ते सरासरीपेक्षा जास्त तर दिनांक 25 ते 31 ऑक्टोबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी व कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.
संदेश : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेला पावसाच्या अंदाज पाहता ज्या शेतकऱ्यांनी पिकाची काढणी केली असल्यास काढणी केलेल्या पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला असल्यामूळे पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुलपिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
काढणी केलेल्या सोयाबीन पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी केलेले सोयाबीन उन्हात वाळवूनच मळणी करावी. पुढील हंगामात बियाण्यासाठी सोयाबीनचा वापर
करण्यासाठी आर्द्रतेचे प्रमाण 14 टक्के असल्यास सोयाबीनची मळणी 400 ते 500 आरपीएम तर आर्द्रतेचे प्रमाण 13 टक्के असल्यास सोयाबीनची मळणी 300 ते 400 आरपीएम थ्रेशरवर करावी जेणेकरून
बियाण्याची उगवण क्षमता कमी होण्यापासून टाळता येईल. मळणी केलेले सोयाबीन साठवणूकीपूर्वी पून्हा तिन ते चार दिवस उन्हात वाळवावे जेणेकरून साठवणूकी दरम्यान
होणाऱ्या बूरशीं व किडीं पासून बियाण्याचे संरक्षण होईल.ऊस पिकावर खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून आल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस 20 % 25 मिली किंवा क्लोरॅट्रानोलीप्रोल 18.5% 4 मिली प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. ऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे,
याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट 30 % 36 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. हळद पिकात कंदमाशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 15 दिवसांच्या अंतराने क्विनालफॉस 25% 20 मिली किंवा डायमिथोएट 30 % 15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
(हळद पिकावर केंद्रीय किटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसल्यामूळे विद्यापिठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत). उघडे पडलेल कंद मातीने झाकून घ्यावेत. हळदीच्या पानावरील ठिपके / करपा रोग याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सिस्ट्रॅाबिन 18.2% + डायफेनकोनॅझोल 11.4% (पुर्वमिश्रित बुरशीनाशक) 10 मिली + 5 मिली स्टीकरसह प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
खरीप पिकांची काढणी केल्यानंतर पाण्याची उपलब्धता असल्यास किंवा जमिनीत ओलावा असल्यास हरभरा पिकाची पेरणी लवकरात लवकर करून घ्यावी. बागायती हरभरा पिकाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिला आठवडया पर्यंत करता येते. बागायती हरभरा पिकाची पेरणी 45 X 10 सेंमी अंतरावर करावी. बागायती हरभरा पेरणी करतांना 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 30 किलो पालाश प्रति हेक्टरी खतमात्रा द्यावी.
पेरणीपूर्वी मर रोगाच्या प्रतिबंधासाठी कार्बेन्डाझीम 2.5 ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा 10 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. तर मूळकूज या रोगाच्या प्रतिबंधासाठी ट्रायकोडर्मा 10 ग्रॅम किंवा थायरम 3 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. खरीप पिकांची काढणी केल्यानंतर पाण्याची उपलब्धता असल्यास किंवा जमिनीत ओलावा असल्यास करडई पिकाची पेरणी लवकरात लवकर करून घ्यावी.
बागायती करडई पिकाची पेरणी 15 नोव्हेंबर पर्यंत करता येते. पेरणी 45 X 20 सेंमी अंतरावर करावी. बागायती करडई साठी शिफारशीत खतमात्रा 60:40:00 पैकी पेरणीच्या वेळी 30 किलो नत्र व 40 किलो स्फुरद प्रति हेक्टरी द्यावे व 30 किलो नत्र एक महिन्यानी द्यावे.
खरीप पिकांची काढणी केल्यानंतर पाण्याची उपलब्धता असल्यास किंवा जमिनीत ओलावा असल्यास रब्बी ज्वारी पिकाची पेरणी लवकरात लवकर करून घ्यावी. बागायती रब्बी ज्वारी पिकाची पेरणी 31 ऑक्टोबर पर्यंत करून घ्यावी. पेरणी 45X15 सेंमी अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी 10 किलो बियाणे वापरावे.
परेणीपूर्वी काणी रोग प्रतिबंधासाठी 300 मेश गंधक 4 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बिजप्रक्रिया करावी. पोंगेमर व खोडमाशीच्या व्यवस्थापनासाठी थायामिथॉक्झाम 70% 4 ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रिड 48% 14 मिली प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी.
फळबागेचे व्यवस्थापन
संत्रा/मोसंबी बागेत फळवाढीसाठी 00:00:50 10 ग्रॅम + जिब्रॅलिक ॲसिड 10 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. डाळींब बागेत फळवाढीसाठी 00:00:50 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. चिकू बागेत पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घेऊन बागेस आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
भाजीपाला
भाजीपाला (मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकात खूरपणी करून तण नियंत्रण करावे. भाजीपाला पिकास आवश्यकतेनूसार पाटाने पाणी द्यावे.
फुलशेती
फुल पिकात खूरपणी करून तण नियंत्रण करावे. उपग्रहाच्या छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला असल्यामूळे फुल पिकास आवश्यकतेनूसार पाटाने पाणी द्यावे. लांब दांड्यांच्या फुलाची (गुलाब) काढणी करतांना कळी उमलण्याच्या अवस्थेत असतांना काढणी करावी तर झेंडू, आष्टूर या सारख्या फुलांची काढणी पूर्ण उमलल्याच्या नंतर करावी.
तुती रेशीम उद्योग
रेशीम किटक कोष न विणने (नॉन स्पिनींग) संकट टाळण्यासाठी प्रश्न काय आहे तो समजून घेतला पाहिजे रेशीम किटक रासायनीक खत, किटकनाशके, बुरशीनाशके आणि तणनाशके यांना संवेदनशिल आहेत. तुती लागवडीपूर्वी त्या शेतात किटकनाशक उदा. कोराझीन कापूस, हळद, सोयाबीन किंवा भाजीपाला पिकात वापर केला असेल तर त्याचे अंश शेतातील मातीत 36 महिने पर्यंत राहतात.
तुती पानात शोषके जावून पुन्हा रेशीम किटकाच्या शरीरात येतात. विषबाधेची लक्षणे, रेशीम किटकास दिसतात. ज्या शेतात तंबाखू किंवा पूर्वी मिरची पिकाची लागवड केली असेल अशा शेतात पण तुती लागवड करूनये. किटकनाशकाचा अंश तुती बागेत येऊ नये म्हणून चोहि बाजूने गीरी पुष्प (ग्लिरीसीडीया) चे बेणे एकास आड एक या तिरप्या पध्दतीने चार ओळी लावाव्यात चोहि बाजूने शेडनेट बांधून त्यावर ठिबक सिंचनचे ड्रिपर लावावेत. एक एचपी मोटारच्या साहाय्याने शेडनेटवर पाणी सोडावे.
पशुधन व्यवस्थापन
वाढीव तापमानापासून गोठयाचे वायू व्हिजन व्यवस्थित पार पडण्यासाठी खिडकी किंवा पंखा याची व्यवस्था करावी तसेच जनावरास पाण्याने स्वच्छ धूवून काढावे, ज्यामूळे जनावरांना उष्णतेचा त्रास होणार नाही.