भर सभेत पक्ष सोडून गेलेल्यांना शरद पवारांचा थेट इशारा
Sharad Pawar's direct warning to those who left the party in Bhar Sabha

निवडणूक प्रचारासाठी आज अंतिम रविवार. शेवटच्या रविवारी विविध पक्षातील नेत्यांकडून आक्रमक भाषणं केली जात आहेत. विरोधकांवर टीकास्र डागलं जातंय.
गेल्या अडीच वर्षांत बदललेल्या समीकरणांचा आढावा घेतला जातोय. त्यावरून मतदारांना आवाहन केलं जातंय. आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनी
पक्ष सोडून गेलेल्यांना इशाराच दिला आहे. सर्वांचा नाद कराचा, पण…. असं म्हणत शरद पवारांनी आज टेंभुर्णी येथील सभा गाजवली.
२०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली होती. त्यांचे ४० आमदार त्यांना सोडून गेले. परिणामी पक्षात दोन गट पडले. पण शरद पवारांसाठी हा अनुभव नवा नव्हता.
१९८० सालीही त्यांना अशाच अनुभवाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी त्यांनी त्यांना सोडून गेलेल्या आमदारांचा कसा पराभव केला याचं उदाहरण देत आताच्या बंडखोर आमदारांना इशारा दिला आहे.
शरद पवार म्हणाले, “१९८० सालात निवडणूक झाली. त्या निवडणुकीत माझ्या आणि सहयोगी पक्षाच्या वतीने एकंदरीत ५८ लोक निवडून आले. मी ५८ लोकांचा नेता झालो. विरोधी पक्षनेता झालो.
एकदा मी चार दिवसांकरता परदेशी गेलो आणि परत आलो तर तत्कालीन मुख्यमंत्री अंतुले यांनी काहीतरी चमत्कार केला होता. निवडून आलेल्या ५८ आमदारांपैकी ५२ आमदारांना ते घेऊन गेले. त्यामुळे सहा लोकांचा नेता राहिलो. विरोधी पक्षनेतेपद गेले.”
“आता काय करणार अशी चर्चा होती. काही केलं नाही. दुसऱ्या दिवशी बाहेर पडलो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलो. तीन वर्षे अहोरात्र प्रयत्न केले. निवडणुकीला जे मला सोडून गेले,
त्यांच्याविरोधात नव्या पिढीचे उमेदवार उभे केले. आणि मला अभिमान वाटतो महाराष्ट्राच्या जनतेला की ते ५२ लोक निवडणुकीत पडले”, असा अनुभव शरद पवारांनी शेअर केला.
ते पुढे म्हणाले, “एकदा रस्ता चुकला की त्याला जागा दाखवलीच पाहिजे. त्यांची जागा दाखवायची असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये साधं सुधं पाडायचं नाही.
जोरात पाडायचं. पूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे की, सगळ्यांचा नाद करायचा…”, असं म्हणताच समोर बसलेल्या समर्थकांमधून आवाज आला की नाद करायचा, पण शरद पवारांचा नाही.”