राज्यातील नवीन सरकारच्या फॉर्म्युल्याबाबत अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
Ajit Pawar gave important information about the formula of the new government in the state.

विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळालं. मात्र, महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. दरम्यान, या निवडणुकीत महायुतील मिळालेल्या यशानंतर राज्यात महायुतीचं सरकार लवकरच स्थापन होईल.
सरकार स्थापन करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये हालचाली सुरु आहेत. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार
अशा तिनही नेत्यांची दिल्लीत उद्या महत्वाची बैठक ठरणार असल्याची माहिती अजित पवारांनी सांगितली आहे. तसेच महायुतीच्या सरकारचा फॉर्म्युला कसा असेल? यावर भाष्य केलं आहे. एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असतील असंही अजित पवारांनी सांगितलं.
“आता आमची जबाबदारी वाढलेली आहे. आम्ही उद्या तिघेही दिल्लीत जाणार आहोत. त्यानंतर दिल्लीत पुढची चर्चा होईल. त्यानंतर एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असं सरकार स्थापन होईल.
आता काही दिवसांतच लगेच नागपूरच अधिवेशन आहे. त्यामुळे पुरवणी मागण्या मंजूर करुन घ्याव्या लागतील. कामाचा प्रेशर राहील. पण आम्ही अनुभवी असल्यामुळे काही अडचण येणार नाही.
राज्याचा विकास करण्याचा प्रयत्न आमचा आहे. तसेच समाजातील सर्व घटकांना बरोबर नेण्याचा प्रयत्न आमचा आहे. केंद्र सरकारकडून राज्यासाठी निधी आणण्याचा प्रयत्नही आमचा आहे”, असं अजित पवार यांनी म्हटलं.
“उद्या दिल्लीत गेल्यानंतर त्या ठिकाणी लोकसभेचं अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे तिथे प्रमुखांना भेटण्याचाही प्रयत्न आमचा असेल. तसेच महायुतीच्या सरकार स्थापनेबाबतची चर्चा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात होईल.
त्यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ असं ठरेल आणि त्याला अंतिम स्वरुप येईल. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे सर्व निर्णय ते घेतील आणि आमच्या पक्षाचे निर्णय आम्ही घेऊ. त्यामुळे त्यांच्याबाबत मी काही सांगू शकत नाही”, असं अजित पवार यांनी म्हटलं.
“मुख्यमंत्रिपदासाठी तुमचं नाव चर्चेत आहे? यावर प्रतिक्रिया विचारली असता अजित पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांना काही वाटत असलं तरी शेवटी प्रत्येकाची संख्या किती आली?
हे देखील पाहिलं जातं. मागच्या अडीच वर्षांची गोष्ट वेगळी होती. पण आताची गोष्ट वेगळी आहे”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
“आपण सर्वजण न्याय व्यवस्थेला महत्त्व देतो. आपण सर्वजण संविधानाच्या समोर नतमस्तक होतो. काल सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की, प्रत्येक वेळेस निवडणुकीत ज्यांचा पराभव होतो,
तो पराभव ईव्हीएमच्या माथी मारला जातो आणि यश आलं की मग ईव्हीएम चांगलं. लोकसभेच्या निवडणुकीवेळी देखील महायुतीचा अतिशय खराब परफॉर्मन्स पाहिला.
मात्र, आम्ही त्यावेळी ईव्हीएमला दोष दिला नाही. काय असतं? कार्यकर्त्याचं मनोधैर्य वाढवण्यासाठी आपले नेते काहीतरी करत आहेत हे दाखवावं लागतं.
आता पश्चिम बंगाल, दिल्ली, केरळ, तेलंगणा या राज्यांचा निकाल लागला तेव्हा ईव्हीएम चांगलं. मात्र, निकाल विरोधात गेला की ईव्हीएम खराब”, असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.