आता ‘ईव्हीएम’विरोधात शरद पवारही मैदानात

Now Sharad Pawar is also in the fray against 'EVM'

 

 

 

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेला महाविकास आघाडीचा दारुण पराभव आणि काही महिन्यांपूर्वी हरियाणात झालेले काँग्रेसचे पानिपत,

 

यानंतर आता काँग्रेसने पुन्हा एकदा कागदी मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा आग्रह धरला असून ईव्हीएमवर आधारित निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त केला आहे;

 

तर काँग्रेसचा सहकारी आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने ईव्हीएमच्या विरोधात कायदेशीर पावले उचलण्यासाठी वकिलांची फौज उभी करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

ईव्हीएमवर संशय घेणाऱ्या उमेदवारांना सबळ पुरावा आणण्याच्या सूचना शरद पवार यांनी दिल्या आहेत. एकूणच इंडिया आघाडीत आता ईव्हीएमविरोधात रोष वाढू लागला आहे.

 

संविधान दिनाच्या (दि. २६ नोव्हेंबर) निमित्त दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत असताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, “आजच्या दिवसानिमित्त मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो,

 

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधीही माझ्याशी सहमत होतील. आमचे पाठिराखे गरीब, वंचित आणि एससी, एसटी, मागासवर्गीय जनता आम्हाला मतदान करतात. पण, त्यांचे मत आम्हाला न मिळता ते फुकट जात आहे.”

 

मल्लिकार्जुन खरगे पुढे म्हणाले, “आम्हाला ईव्हीएम वगैरे काही नको, आम्हाला पुन्हा मतपत्रिकेवर मतदान हवे आहे. हे सर्व मतदानयंत्र त्यांच्या (भाजपा) घरी पाठवून द्या. ते मोदींच्या घरी ठेवा किंवा

 

अमित शाहांच्या घरी ठेवा. तिकडे अहमदाबादमध्ये अनेक गोदामे आहेत, तिकडे मतदानयंत्रे ठेवा, आमची काही हरकत नाही. आम्हाला कागदी मतपत्रिका द्या, म्हणजे तुम्ही (भाजपा) कुठे आहात आणि तुमची स्थिती काय आहे, हे तुम्हाला कळेल.”

पुढील काही दिवसांत ईव्हीएम विरोधी मोहीम उघडण्यात येईल आणि त्यात सहभागी होण्यासंदर्भात ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा केली जाईल, असेही खरगेंनी स्पष्ट केले.

 

तसेच इंडिया आघाडीतील इतर पक्षांनाही या मोहिमेत सामावून घेतले जाईल आणि मतदान यंत्रांविरोधात जनजागृती करण्यासाठी ‘भारत जोडो’ यात्रेसारखी मोहीम राबवली जाईल, असेही खरगे म्हणाले.

दरम्यान, शरद पवारांनी मंगळवारी (दि. २६ नोव्हेंबर) त्यांच्या सर्व आमदार आणि पराभूत उमेदवारांची बैठक घेतली. राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना म्हणाले,

 

“पक्षाच्या बैठकीत अनेक उमेदवारांनी एकूणच निवडणूक प्रक्रिया आणि ईव्हीएम यंत्रावर आपली नाराजी व्यक्त केली. आमच्या अध्यक्षांनी (शरद पवार) ही बाब गंभीरपणे घेतली असून

 

उमेदवारांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी विधी पथक नेमण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. निवडणूक आयोग आणि न्यायालयीन कामकाजासंदर्भात हे पथक उमेदवारांना मार्गदर्शन करेल.”

 

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या सर्वच पराभूत उमेदवारांनी व्हीव्हीपॅट स्लीपची मोजदाद केली जावी, अशी मागणी केली. मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड हे ९६ हजारांच्या मताधिक्याने निवडून आले.

 

त्यांनीही या मागणीला पाठिंबा दिला. आव्हाड म्हणाले, “शरद पवार हे नेहमीच राष्ट्रव्यापी आंदोलनाचे नेतृत्व करत आले आहेत. आताही EVM च्या विरोधात एक राष्ट्रव्यापी आंदोलन होणे गरजेचे आहे आणि शरद पवारांनीच त्याचे नेतृत्व करावे, अशी मागणी मी केली.”

 

ईव्हीएमच्या विरोधात भूमिका घेण्याची काँग्रेसची ही पहिलीच वेळ नाही. मात्र, याबाबत इंडिया आघाडीतच मतमतांतरे आहेत. काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे एक सदस्य नाव न घेण्याच्या अटीवर म्हणाले की,

 

मला व्यक्तीशः यात तथ्य वाटत नाही, पण पक्षाशी निष्ठा असल्यामुळे मी हे जाहीरपणे सांगू शकत नाही. तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार डेरेक ओब्रायन म्हणाले,

 

आम्ही या विषयावर गेल्या अनेक वर्षांपासून ठाम भूमिका मांडत आहोत. आम्हाला बॅलेट पेपरवरच मतदान हवे आहे. आम्ही ईव्हीएमद्वारे अनेक निवडणुका जिंकत आलो असलो तरी आम्हाला बॅलेट पेपरवरच निवडणुका हव्या आहेत.

 

भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे महासचिव प्रकाश करात म्हणाले की, आमच्या पक्षाने अद्याप पुन्हा एकदा कागदी मतपत्रिकेवर परतण्याचा विचार केलेला नाही.

 

ईव्हीएम यंत्राच्या प्रणालीमध्ये नक्कीच काही बदल आणि सुधारणा करणे आवश्यक आहे, अशी आमची भूमिका आहे. मशीनमध्ये बदल करण्याच्या बाबतीत ते म्हणाले, सध्या व्हीव्हीपॅट मशीन मध्यभागी आहे,

 

ती शेवटी लावणे आवश्यक आहे. सध्या पहिल्या स्थानावर ईव्हीएम आहे, जिथे बटण दाबून तुम्ही मतदान करता. त्यानंतर मध्यभागी व्हीव्हीपॅट मशीन आहे, जिथे मतदान केल्याची पावती दिसते.

 

पण, तिसऱ्या स्थानावर असलेल्या कंट्रोल युनिटमध्ये काय जात आहे, याची आपल्याला कल्पना नाही. त्यामुळे मध्यभागी कंट्रोल युनिट असावे आणि सर्वात शेवटी व्हीव्हीपॅट मशीन असावी, असे प्रकाश करात म्हणाले. याबद्दल आम्ही काँग्रेससह इतर पक्षांशीही बोललो आहोत.

 

राष्ट्रीय जनता दलाचे नेते मनोज झा याबद्दल म्हणाले की, इंडिया आघाडीने आधी सर्व उपलब्ध पर्यायांचा विचार केला पाहिजे असे मला वाटते.

 

मतपत्रिकेच्या बाजूने सर्वसंमतीने निर्णय झाल्यावर त्या दिशेने आपण सर्वांनी जायला हवे. परंतु, त्याआधी त्यावर व्यापक चर्चा होणे गरजेचे आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *