प. महाराष्ट्रात अवकाळीचा धुमाकूळ;मराठवाड्यात कधी पडणार अवकाळी पाऊस ?
P. Unseasonal rains in Maharashtra; When will unseasonal rains fall in Marathwada?

कराड व लगतच्या मलकापूर शहर परिसराची मंगळवारी सायंकाळी सव्वापाचपासून सुरू झालेल्या सोसाट्याचे वारे, जोरदार विजा, गारपीट अन् बेसुमार पावसाने दैना उडवून दिली.
शेजारच्या प्रदेशातही अशीच स्थिती असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, अंधाराच्या साम्राज्यात ठिक-ठिकाणी झाडे उन्मळल्याने तसेच पाणी तुंबल्याने पुणे- बंगळूरू महामार्गासह अन्य मार्गही ठप्प झाल्याने वाहनधारक व प्रवाश्यांचे प्रचंड हाल झाले.
कमालीच्या उष्म्यानंतर कोसळलेल्या बेसुमार पावसाने अक्षरशः दाणादाण उडाली. गारांचा खच साचला. झाडे उन्मळली, विजेचे खांब वाकले, कच्ची घरे, झोपड्या जागीच झोपल्या.
सर्वत्र पाणीच पाणी आणि अंधाराचे साम्राज्य पसरल्याने समाजमन भयभीत झाले. अनेक ठिकाणी स्थावर मिळकतीचेही नुकसान झाले.
काढणी न झालेल्या ज्वारी व गव्हासह भाजीपाल्याचेही नुकसान दरम्यान, पावसाने वातावरणात गारवा पसरल्याने उष्णतेने हैराण जीवांना दिलासा मिळाला. लहान मुले व युवकांनी पावसात भिजत गारा वेचण्याचा आनंद लुटला.
अचानक आलेल्या तुफान वादळी वाऱ्यातील पावसाने नोकरीवरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांसह शाळेहून घरी परतणारे विद्यार्थी, छोटे उद्योजक अन् लोकांची एकच तारांबळ उडाली.
शहरातील वाहतूकही विस्कळीत झाली. छत्रपती शिवाजी स्टेडीयमला भव्य तळ्याचे स्वरूप आले होते. कराडच्या भाजी मंडईतील छोट्या विक्रेत्यांसह व्यापारांचीही तारांबळ घडली.
शिवतीर्थ दत्त चौकातील कलिंगड विक्रेत्यांची कलिंगड रस्त्यावरील वेगाने वाहणाऱ्या पाण्यात वाहत गेली. त्यांची जमवाजमव करून बाकीचा माल वाचवण्यासाठी या विक्रेत्यांची कसरत दिसून आली. सव्वा तासानंतर पावसाचा जोर ओसरल्याने शहरातील विस्कळीत वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे चित्र आहे.
पुणे- बंगळुरू महामार्गावर गोटे (ता. कराड) येथील एका पंचतारांकित हॉटेलच्या दर्शनी भागातील काचा गारपीट आणि सोसायट्याच्या वाऱ्यामुळे फुटल्या. हॉटेलमध्ये पावसाचे पाणी शिरून नुकसान झाले.
कराड, मलकापूर परिसरातील तुफान पावसात सलग १५ मिनिटे गारांचा मारा झाला. सर्वत्र गारांचा खच साचताना, लहान मुले, युवकांनी पावसात भिजत गारा वेचण्याचा आनंद लुटला.
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार 02 एप्रिल रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना व बीड जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 50 ते 60 कि.मी.) राहून काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तर तूरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता आहे.
दिनांक 01 व 03 एप्रिल रोजी बीड व धाराशिव जिल्हयात ; दिनांक 02 एप्रिल रोजी परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
दिनांक 03 एप्रिल रोजी परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात ; दिनांक 04 एप्रिल रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
पुढील तीन दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 4 अं.से. ने घट होऊन त्यानंतर हळूहळू वाढ होण्याची तर पुढील चार ते पाच दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 04 ते 10 एप्रिल 2025 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित जास्त राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.
संदेश : वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, काढणी व मळणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कापूस पिकाच्या पऱ्हाट्या काढून त्याची योग्य विल्हेवाट लावावी जेणेकरून गुलाबी बोंड अळीच्या जीवनक्रमात घट पडेल.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, मळणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळणी केलेला माल पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच गारपीटीचा अंदाज लक्षात घेता,
मळणी न केलेल्या व मळणीस तयार असलेल्या गहू पिकाची लवकरात लवकर मळणी करावी. मळणी करणे शक्य नसल्यास काढणी केलेला माल ताडपत्रीने झाकून ठेवावा.
मळणी केलेला माल पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता, सध्या हळदीची काढणी सुरु आहे. काढणी केलेल्या हळदीची उघड्यावर साठवण करू नये. काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी (गोदामात) साठवणूक करावी.
उन्हाळी भुईमूग पिकात आवश्यकतेनूसार तुषार सिंचन पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे. उन्हाळी भुईमूग पिकात रसशोषण करणाऱ्या (मावा, तुडतुडे, फुलकीडे व पांढरी माशी) कीडींना आकर्षीत करण्यासाठी एकरी 10 ते 12 पिवळे व निळे चिकट सापळे लावावेत व तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीचे व लाल केसाळ अळीचे समूहातील अंडी लहान अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात.
उन्हाळी भुईमूग पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंचा ॲझाडिरेक्टिन (30 पीपीएम) 3 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी.
वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, घड लागलेल्या केळी झाडांना काठीने आधार द्यावा. काढणीस तयार असलेल्या केळीच्या घडांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. केळी बागेस आवश्यकतेनूसार सरी वरंब्याने पाणी द्यावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी केळी फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे.
नविन लागवड केलेल्या केळीच्या रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोपांना सावली करावी. वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी.
आंबा बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी आंबा फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे. नविन लागवड केलेल्या आंब्याच्या रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोपांना सावली करावी.
आंबा बागेत 00:00:50 15 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता, काढणी राहिलेल्या द्राक्ष फळांची काढणी करून घ्यावी. द्राक्ष बागेत एप्रिल छाटणीची पुर्व तयारी करून घ्यावी.
वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, काढणीस तयार असलेल्या भाजीपाला, टरबूज, खरबूज पिकांची काढणी करून घ्यावी. भाजीपाला पिकात खूरपणी करून भाजीपाला पिक तण विरहीत ठेवावे. नविन लागवड व पूर्नलागवड केलेल्या रोपांना आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.
भाजीपाला ( मिरची, वांगे व भेंडी) पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यस्थापनासाठी पायरीप्रॉक्सीफेन 5% + फेनप्रोपाथ्रीन 15% 10 मीली किंवा डायमेथोएट 30% 13 मीली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फुल पिकात खूरपणी करून फुल पिक तण विरहीत ठेवावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून बाजार पेठेत पाठवावी.
वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, चेतावनीच्या काळात जनावरे शक्यतो चरावयास बाहेर नेऊ नयेत. जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये, निवाऱ्याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी.
आपल्या पशुंना उन्हामध्ये बांधु नका (निदान तिव्र उन्हाच्या कालावधीमध्ये त्यांना झाडाखाली/सावलीमध्ये किंवा शेड/गोठ्यामध्येच बांधणे चांगले). पशुंना शक्यतो थंड/स्वच्छ/मुबलक पाणी दोन-तिन वेळेस पाजावे.
पाण्यामुळे पशुंच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी (डीहायड्रोजन) होणार नाही. जमल्यास पाण्यामधून क्षार द्यावेत, 5 लिटर पाण्यामध्ये चिमुटभर गुळ (25 ग्रॅम), थोडे मिठ (5-10 ग्रॅम) आणि 5 ग्रॅम क्षार मिश्रण दिल्यास उत्तम, मात्र नजीकच्या पशुवैद्यकाचा सल्ला घेऊनच व्यवस्थापन करावे.