महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा’, मोदी देश विकून टाकतील
'Major scam in Maharashtra assembly elections', Modi will sell out the country

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबात मोठा आरोप केला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला आता चार महिने पूर्ण झाले आहेत.
यानंतरही या निवडणुकीवरुन वेगवेगळे दावे केले जात आहे. विरोधकांकडून सातत्याने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावरुन ईव्हीएम घोटाळाचा आरोप केला जातो.
काँग्रेसचं सध्या गुजरातच्या अहमदाबाद येथे अधिवेशन पार पडत आहे. या अधिवेशनात भाषण करताना मल्लिकार्जुन खर्गे यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. “महाराष्ट्रात 55 लाख मतदार कसे वाढले?”, असा सवालही मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे.
“मी कुठेच ऐकलं नाही, कुठेच पाहिलं देखील नाही. भाजप इथे 150 जागा लढवते आणि त्यापैकी 138 जागांवर जिंकून येते. 90 टक्के रिझल्ट? इतका मोठा रिझल्ट या देशात कधी पाहिला आहे का?
आम्ही देखील अनेक निवडणुका पाहिल्या आहेत. मी सुद्धा 12 ते 13 निवडणुका लढलो आहे. असं कधीच झालं नाही. जो घोटाळा महाराष्ट्रात झाला तो फक्त लोकशाहीला नष्ट आणि तंग करण्यासाठी केला,
तसेच विरोधकांचा पराभव करण्यासाठी केलं आहे. आपल्याला या विरोधात लढायचं आहे”, असं मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.
“अरे तुम्ही अशी टेक्निक बनवली आहे ज्याने तुम्हाला फायदा होईल. विरोधकाना नुकसान होईल, अशी टेक्नोलॉजी बनवून आमचा पराभव करत असाल तर आज किंवा उद्या या
देशाचे तरुण नक्की या विरोधात लढा देतील. तुमचा हात पकडून ते सांगतील आम्हाला बॅलेट पेपर पाहिजे, ईव्हीएम नको”, असं मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.
“संपूर्ण जग ईव्हीएम पासून बॅलेट पेपरच्या दिशेला जात आहे. पण आपल्या देशात ईव्हीएमचा वापर केला जातोय. ही सर्व फसवणूक आहे. ईव्हीएमचा वापर बंद केला पाहिजे. भारतातही बॅलेट पेपरने निवडणुका व्हायला पाहिजेत”, अशी मागणी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली.
“देश सध्या एकाधिकारशाहीकडे जात आहे. सर्वसामान्य नागरिकांची संपत्ती या सरकारने आपल्या श्रीमंत मित्रांकडे हस्तांतरित केली जात आहे. ज्याप्रकारे सार्वजनिक क्षेत्रांचे उपक्रम त्यांच्या मित्रांकडे सोपवले जात आहेत,
ते पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी एकेदिवशी आपला देश विकून टाकतील ते दिवस दूर नाहीत. सरकारची संपत्ती त्यांच्या श्रीमंत मित्रांच्या हातात दिली जात आहे”, असा देखील आरोप मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.