मनोज जरांगे पाटील महाविकास आघाडीवर भडकले
Manoj Jarange Patil got fired at Mahavikas Aghadi

मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी महायुती सरकारने आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते.
मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
धाराशिव येथे पत्रकारांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सगळीकडे चांगल्या रॅली झाल्या आहेत. सगळीकडे बंदोबस्त चांगला आहे. या दौऱ्याला न्याय
आणि आमच्या वेदना म्हणून बघतो. आम्हाला न्याय हवाय. जातीयवाद कमी व्हावा, हा या शांतता रॅलीचा उद्देश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या बैठकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पाठ फिरवली. याबाबत मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सगळ्याच आमदारांना आवाहन आहे की,
सगळ्या आमदारांनी ओबीसीतून आरक्षण मिळावे म्हणून प्रयत्न करावेत. प्रश्न लावून धरावा, आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्यायचं की नाही हे सगळ्यांनी आम्हाला सांगावं.
ओबीसीतून आरक्षण द्या, असे म्हणायला विरोधकांनी जायला हवं होतं. एक हाणल्यासारखे आणि दुसरा रडल्यासारखे करत आहे. हा सगळ्यांचा डाव आहे.
म्हणून समाज रस्त्यावर उतरला आहे. समाज मागास सिद्ध झाला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायला हवं. मराठ्यांना आरक्षण न देण्यास मविआचाही छुपा पाठिंबा आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 13 तारखेचा अल्टीमेटम दिला आहे. याबाबत ते म्हणाले की, रोज बोलणं सुरू आहे. 13 तारखेच्या नंतर समाजाची बैठक घेऊन भूमिका जाहीर करू.
वारकऱ्यांचे मनं दुखतील, असं काही केले जाणार नाही. देवाच्या ठिकाणी आरक्षण आणणार नाही. वारकऱ्यांना त्रास होईल, असा निर्णय घेणार नाही.
आरक्षणाची लढाई वेगळ्या मार्गाने लढू. 13 तारखेच्या नंतर बाकी ठरवू, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, अर्चना पाटील यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली.
याबाबत मनोज जरांगे पाटील म्हणाले की, समाज म्हणून त्या आल्या असतील. समाजाचं कुणीही आलं तरी स्वीकारावं लागते, असे त्यांनी सांगितले.









