भुजबळ म्हणाले आपण ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो
Bhujbal said he went with BJP to get rid of ED

राजदीप सरदेसाई यांच्या ‘२०२४ : द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकातील छगन भुजबळ यांच्या एका मुलाखतीवरुन राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे.
या मुलाखतीमध्ये छगन भुजबळ यांनी आपण केवळ ईडीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी भाजपसोबत गेल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि महायुतीची कोंडी होण्याची शक्यता आहे.
‘दैनिक लोकसत्ता’मध्ये छापून आलेल्या वृत्तानुसार, या पुस्तकातील मुलाखतीत छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपबरोबर
महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्याचा आनंद पक्षाच्या सर्वच नेत्यांना झाला होता. कारण अर्थातच ईडीपासून सुटका… ती झाल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला…
माझ्यासाठी तर ईडीपासून सुटका म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच होता…’ अशा नि:संदिग्धपणे राष्ट्रवादीचे (अजित पवार) नेते व राज्याचे अन्न आणि नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ हे सूचित करतात.
‘मी ओबीसी असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लागल्या. उच्च जातीचा असतो तर मला असे वागवले नसते’, असे छगन भुजबळ यांनी मुलाखतीत म्हटल्याचे पुस्तकात नमूद करण्यात आले आहे.
दोन वर्षांपूर्वी २ जुलै २०२३ या दिवशी अजितदादांनी शरद पवार यांचा हात सोडला आणि प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे आदी प्रमुख नेत्यांसह ते भाजपच्या आश्रयास गेले.
एकनाथ शिंदे यांनी जे शिवसेनेबाबत केले तेच अजितदादांनी राष्ट्रवादीशी केले. दोन्हींतही समान धागा भाजप हाच. तसेच यात आणखी एक साम्य आहे.
एकनाथ शिंदे यांच्या अनेक साथीदारांप्रमाणे अजितदादांच्या अनेक साथीदारांवर विविध आरोप होते आणि काहींवर केंद्रीय यंत्रणांच्या कारवाया सुरू होत्या.
खुद्द अजितदादा हेच ईडीच्या कचाट्यात होते. त्याच भीतीने या सर्वांनी पक्षत्याग करून भाजपशी घरोबा केला असे तेव्हाही बोलले जात होते. भुजबळ यांच्या या कबुलीने या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले आहे.
‘दोन-अडीच वर्षे तुरुंगात काढल्यावर जामिनावर असताना मला ईडीची पुन्हा नोटीस आली. वयाच्या पंचाहत्तरीत किती वेळा चौकशांना सामोरे जायचे, असा प्रश्न होता.
आधी १०० कोटींच्या आरोपांवरून राष्ट्रवादीचे आणखी एक नेते अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली होती’, असे सांगून भुजबळ हे देशमुख यांच्या आरोपांचा दाखला देतात.
‘तुरुंगात असताना भाजपमध्ये सहभागी व्हा तरच सुटका होईल’, असा निरोप देशमुख यांना देण्यात आला होता, असा त्यांचा आरोप आहे. तेव्हा आता ते मलाही अडकविण्याचा पुन्हा प्रयत्न करीत असावेत,
अशी भुजबळांची प्रतिक्रिया होती. ‘अजूनही तुरुंगातील दिवस आठवले की माझी झोप उडते. आता या वयातही ईडी माझा पिच्छा सोडायला तयार नाही’, असे भुजबळ म्हणतात.
‘अजित पवार, त्यांची पत्नी सुनेत्रा, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, नवाब मलिक अशा विविध नेत्यांना ईडीच्या चौकशांना सामोरे जावे लागले होते.
मला, देशमुख व मलिकांना ईडीने अटक केली होती. अशा वेळी पंतप्रधान मोदी वा भाजपबरोबर हातमिळवणी केल्याशिवाय सुटका नाही ही साऱ्यांचीच भावना झाली होती.
हा विषय आम्ही पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे मांडला. पवारांना हे सारे समजत होते. पण ते भाजपबरोबर जाण्यास अनुकूल नव्हते. तेव्हा अखेर अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली
पक्षाच्या आमदारांनी भाजपबरोबर हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय पक्षाच्या बहुतांशी नेत्यांना मान्य होता. भाजपबरोबर गेल्याने ईडीच्या जाचापासून साऱ्यांची सुटका झाली’, अशी भावना भुजबळांनी व्यक्त केली.
दैनिक लोकसत्तामध्ये छापून आलेल्या वृत्तानंतर छगन भुजबळ यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मी अशी कोणतीही मुलाखत दिलेली नाही.
अनेक वृत्तवाहिन्यांवर छगन भुजबळ यांनी पुस्तक लिहिले, असा उल्लेख आहे. असे कोणतेही पुस्तक छगन भुजबळ यांनी लिहिले नाही .
याबाबत सविस्तर खुलासा स्वतः छगन भुजबळ हे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन करणार आहेत, अशी माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.