भाजप मोठा पक्ष, आता मुख्यमंत्री ,BJP नेत्याने सांगितले ……..
BJP is a big party, now the Chief Minister, said the BJP leader ........

महायुतीला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकहाती सत्ता मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीने 288 पैकी 225 हून अधिक जागांवर
आघाडी मिळवल्याचं आतापर्यंतच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.असं असतानाच आता मुख्यमंत्री कोण होणार यावरुन वेगवेगळ्या चर्चा सुरु असतानाच भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडेंनी मुख्यमंत्री कधी ठरणार याबद्दलचं भाष्य केलं आहे.
भाजपा महायुतीच्या इतर पक्षांना विश्वासात घेऊन मुख्यमंत्रिपदावर दावा करणार का? की अजूनही चर्चा बाकी आहे? असा सवाल विनोद तावडेंना ‘आजतक’वरील मुलाखतीमध्ये विचारण्यात आला.
“आता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांची पत्रकार परिषद झाली असून आम्ही जनतेचे आभार मानले आहेत. मोदींच्या नेतृत्वामध्ये आज महाराष्ट्रात महायुतीच सरकार बनणार आहे.
सरकारचा प्रमुख नेता कोण असेल हे एकनाथजी, देवेंद्रजी आणि अजितदादांबरोबर भाजपाचं केंद्रीय नेतृत्व आज रात्री किंवा उद्या दुपारपर्यंत ठरवेल,” असं विनोद तावडेंनी म्हटलं.
“प्रवीण दरेकरांनी सांगितलं की 2014 पेक्षा अधिक जागा आम्हाला मिळाल्या आहेत. तर भाजपाचा मुख्यमंत्री झाल्यास फडणवीसांनी मुख्यमंत्री व्हावं, असं मला वाटतं.
कार्यकर्त्यांच्या भावाना लक्षात घेऊन भाजपाला मुख्यमंत्री आपलाच नेता केला पाहिजे असं वाटतं का?” असा प्रश्न तावडेंना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना तावडेंनी,
“कार्यकर्ता आपल्या भावना मांडतात. मला राष्ट्रीय महामंत्र्याला हे नक्की माहिती आहे की तिन्ही नेते आणि केंद्रीय नेते एकत्र बसून हा निर्णय घेतील,” असं उत्तर दिलं.
234 जागा आल्यानंतरही बलिदान देणार का? की मुख्यमंत्री पद आता भाजपाचा नैसर्गिक अधिकार आहे का? असा सवाल तावडेंना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना तावडेंनी,
” याचं विश्लेषण केंद्रीय नेतृत्वाच्या बैठकीनंतरच करता येईल. मी शक्यतांवर बोलत नाही. मी फॅक्ट्सवर बोलतो. फॅक्ट हा आहे की केंद्रीय नेतृत्वाबरोबर बसून निर्णय घेतला जाईल,” असं उत्तर दिलं.
“तुम्हाला मिळालेलं मताधिक्य पाहता तुम्हाला 80 टक्क्यांहून अधिक जागा मिळाल्याचं दिसत आहे. स्ट्राइक रेटचा विचार केल्यास हा भाजपाचा विजय आहे,”
असं म्हणत प्रश्न विचारला असता तावडेंनी, “हा विजय भाजपाचा, राष्ट्रवादीचा, शिवसेना, आरपीआयचा आहे,” अशी प्रतिक्रिया नोंदवली.
आता बैठका आणि पुढील वाटचाल कशी असणार? तुमचं संसदीय बोर्ड काही निर्णय घेणार का? त्यानंतर तीन पक्षांची बैठक होणार? नेमकं होणार काय? अमित शाहांनी एकनाथ शिंदे, अजित पवारांची चर्चा केल्याची बातमी आहे,
असं म्हणत विचारणा करण्यात आली. त्यावर तावडेंनी, “26 तारखेला नवीन सरकार स्थापन झालं पाहिजे हे संविधानानुसार निश्चित आहे. आज भाजपाच्या केंद्रीय कार्यालयामध्ये विजयाच्या जल्लोषासाठी सर्व नेते एकत्र येतील.
त्यावेळी केंद्रीय संसदीय मंडळाच्या बैठकीवर चर्चा होईल. मला वाटतं त्याआधी आज रात्री किंवा उद्यापर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस,
अजित पवार केंद्रीय नेतृत्वाबरोबर चर्चा करुन घेईल. त्यानंतर संसदीय समितीबरोबर चर्चा करुन इथे निरिक्षक 24 किंवा 25 ला येतील,” असं तावडे म्हणाले.
राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन होणार असल्याचे आता स्पष्ट झालं आहे. कारण, विधानसभा निवडणुकांच्या निकालात भाजप महायुतीने मोठी आघाडी घेतली आहे.
तब्बल 200 पेक्षा जास्त जागांवर महायुतीला आघाडी असून अनेक उमेदवार विजयी देखील झाले आहेत. विशेष म्हणजे भाजपला 120 पेक्षा जास्त जागांवर आघाडी दिसत असून भाजपच राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरल्याचं दिसून येत आहे.
त्यामुळे, भाजप कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी आत्ताच भाजपचा मुख्यमंत्री होणार, देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील, अशा आशयाचे बॅनरही झळकवायला सुरुवात केली आहे.
त्यामुळे, महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण, असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. त्यातच, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी 25 तारखेला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणून, महाराष्ट्राचा नवीन सरकारमधील मुख्यमंत्री कोण हे कोडे लवकरच उलगडेल.
राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ 26 तारखेला संपत असल्यामुळे एक दिवस आधीच महायुती सरकार स्थापन करणार असल्याची माहिती एबीपी माझाला विश्वनीय सूत्रांनी दिली आहे.
त्यामुळे, मुख्यमंत्री कोण होणार हे पुढील 3 दिवसांतच स्पष्ट होईल, असे दिसून येते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे. महायुतीत ज्या पक्षाला जास्त जागा मिळतील,
त्याचा मुख्यमंत्री, असं आमचं काही ठरलं नव्हतं. प्रथम निवडणुकीच्या निकालाचे अंतिम आकडे येऊ दे. मग आम्ही तिन्ही पक्ष ज्याप्रमाणे जागावाटपाच्या चर्चेसाठी बसलो होतो, त्याप्रमाणे एकत्र बसू.
पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे.पी.नड्डा आणि तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र बसून चर्चा करतील. आम्ही जशी निवडणूक लढलो तसा मुख्यमंत्रीपदाबाबतही एकत्र चर्चा करुन निर्णय घेऊ,
असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. त्यामुळे, एकनाथ शिंदेंकडूनही मुख्यमंत्रीपदावर दावा केल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, यंदा विधानसभेच्या निवडणुका गत 2019 च्या तुलनेत उशीरा झाल्याने
विधानसभेचा कार्यकाळ पुढील तीन दिवसांत संपुष्टात येत आहे. त्यामुळे, 26 नोव्हेंबर पर्यंत राज्यात सरकार स्थापन होऊन महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळेल का हे पाहावे लागेल.
निकालाची अपेक्षा होती, असे निकाल येतील असे नाही पण सकारात्मक निकाल येतील असा विश्वास होता. कारण, लोकसभा निवडणुकीनंतर जी मेहनत सर्वांनी घेतली, त्यामुळे निकाल खूप चांगला आला.
गेल्या 6 महिन्यांपासून मायक्रो लेव्हलवर काम सुरू होतं, ग्रासरुट लेव्हलपर्यंत काम केल्याशिवाय असा निकाल येत नाही. देवेंद्र फडणवीस हे गेल्या टर्ममध्ये मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत.
देवाभाऊंचा हा सर्वात स्ट्राँग पॉइंट आहे की, ही डसन्ट केअर अबाऊट… त्यांना पदाची काही फिकर नाही. राजकारणामध्ये पदं येत राहतात आणि जात राहतात, पण आपलं काम करत राहणे हीच देवाभाऊंची विशेषत: आहे,
अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांचे सख्खे भाऊ आशिष फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. महायुतीला जे यश मिळतंय, त्यामध्ये भाजप मोठा पक्ष आहे. त्यामुळे, मुख्यमंत्रीपदाची संधी त्यांना मिळायला हवी, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केलीय.