केंद्रीय मंत्री रामदास आठवले परभणीत म्हणाले,.‘पोलिसांच्या मारहाणीमुळेच सोमनाथचा मृत्यू
Union Minister Ramdas Athawale said in Parbhani, 'Somnath died due to police beatings.'

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज परभणीत जावून न्यायालयीतन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.
यावेळी त्यांनी नेमकं काय घडलं होतं? ते समजून घेतलं. त्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मोठं वक्तव्य केलं. सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांच्या मारहाणीमुळेच मृत्यू झाला,
असा आरोप रामदास आठवले यांनी केला. यावेळी रामदास आठवले यांनी बीडच्या घटनेरही प्रतिक्रिया दिली. “सोमनाथ सूर्यवंशी लातूर जिल्ह्याचा रहिवासी होता.
तो परभणीत लॉचा विद्यार्थी होता. आंदोलनात त्याचा काही संबंध नव्हता. तो तिथे फोटो काढत होता. पोलिसांनी सांगितले हार्ट अटॅकने मृत्यू झाला. मात्र पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला.
दोषी पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. संविधान प्रतिकृतीची विटंबना झाली होती. त्यानंतर युवकांमध्ये संताप होता.
पकडून मारहाण करणे चुकीचे आहे. लॉकअपमध्ये मारहाण झाली. त्यामुळे सोमनाथचा मृत्यू झाला, असं आमचं म्हणणं आहे”, असा आरोप रामदास आठवले यांनी केला आहे.
“सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे कुटुंबीयांना मदत मिळावी यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. पोलिसांनी अन्याय करणे बरोबर नाही.
विटंबना करणारा मनोरुग्ण नाही. मी राज्याच्या पोलीस महासंचालक रक्ष्मी शुक्ला यांना या विषयी बोलणार आहे. आम्ही नक्की पाठपुरावा करू. आम्ही आरपीआय पक्षाकडून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत देणार आहोत.
विजय वाकोडे यांचं स्मारक उभारण्यासाठी मनपाने जागा द्यावी. आम्ही आमच्या खात्यामार्फत निधी देण्यासाठी प्रयत्न करू”, असं रामदास आठवले म्हणाले.
रामदास आठवले यांनी यावेळी बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरही प्रतिक्रिया दिली. “बीड प्रकरणाशी धनंजय मुंडे यांचा सरळ संबंध नाही असे मला वाटते.
मात्र दोषींवर कारवाई झालीच पाहिजे. मास्टर माईंड कोण आहे हे मला माहीत नाही. मात्र तपास माझ्याकडे दिल्यास मास्टरमाईंड कोण आहे हे शोधून काढीन.
मी बीड जिल्ह्यात जाऊन आलो. संतोष देशमुखचे आरोपी अद्यापही सापडत नाही. मस्साजोग प्रकरणात अद्यापही घरच्यांचा जबाब घेतला नाही.
सीआयडीने लवकर जबाब घ्यावा. ही गृह विभागासोबतच पोलिसांची जबाबदारी आहे. सीआयडीकडे बीडचा तपास आहे”, असं रामदास आठवले म्हणाले.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज परभणीत न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेतली.
यावेळी आंदोलक महिलांनी रामदास आठवले यांच्यासमोर चांगलाच आक्रोश व्यक्त केला. पोलिसांनी आम्हाला घरात घुसून मारहाण केल्याचा आरोप करत महिलांनी आक्रोश केला.