ईडीच्या ताफ्यावर हल्ल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवतीच्या हालचाली
President Rajwati's move in West Bengal after the attack on the ED convoy

पश्चिम बंगालमध्ये सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) छाप्याच्या वेळी शुक्रवारी राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याच्या समर्थकांनी अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याची घटना घडली.
केंद्रीय तपास यंत्रणेवर सातत्याने टीका होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या हल्ल्यानंतर पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापले आहे.
एकीकडे विरोधकांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे, राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनीही, आपण सर्व घटनात्मक पर्यायांचा विचार करू आणि या प्रकरणावर योग्य ती कारवाई करू, असे सूचित केले आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिवसभरात १५ ठिकाणी छापे टाकले. त्यात तृणमूलचे नेते शेख शाहजहान यांच्या निवासस्थानाचा समावेश होता. यावेळी शाहजहान यांच्या समर्थकांकडून ईडी अधिकाऱ्यांवर हल्ला झाला.
समर्थकांनी अधिकाऱ्यांना मारहाण केली आणि त्यांच्या वाहनांची तोडफोड केली. शाहजहान हे राज्यमंत्री ज्योतिप्रिया मल्लिक यांचे निकटवर्तीय मानले जातात.
कोट्यवधी रुपयांच्या रेशन वितरण घोटाळ्याप्रकरणी ज्योतिप्रिया मल्लिक यांना अटक करण्यात आली आहे. याच प्रकरणामध्ये सुरू असलेल्या तपासासाठी हा छापा महत्त्वाचा मानला जात होता.
ईडीचे अधिकारी सकाळी २४ परगणा भागातील शेख यांच्या निवासस्थानी पोहोचले तेव्हा मोठ्या संख्येने तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांनी ईडीचे अधिकारी आणि त्यांच्यासोबत असलेल्या केंद्रीय दलाच्या जवानांना घेराव घातला.
त्यानंतर त्यांनी निदर्शने करून त्यांच्यावर हल्ला केला. अधिकाऱ्यांना रिक्षा आणि दुचाकीवरून घटनास्थळ सोडावे लागले, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. दोन अधिकारी गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.
अशा प्रकारचा हल्ला अनपेक्षित आहे. आम्ही शेख शाहजहानबाबतचा अहवाल दिल्ली कार्यालयात पाठवू, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
ईडीच्या छाप्याचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींनाही जमावाने लक्ष्य केले आणि त्यांच्या वाहनांचीही तोडफोड केली.
राज्यपाल बोस यांनीही या प्रकरणावर टीका केली. २४ परगणा भागातील हल्ला रोखण्यात राज्य सरकार असमर्थ ठरल्याचे ते म्हणाले. ‘२४ परगणा जिल्ह्यातील भीषण घटना चिंताजनक आणि निषेधार्ह आहे.
लोकशाहीत रानटीपणा आणि गुंडगिरी थांबवणे हे सुसंस्कृत सरकारचे कर्तव्य आहे. राज्यपाल या नात्याने मी योग्य ती कारवाई करेन. तसेच माझ्या सर्व घटनात्मक पर्यायांचा शोध घेईन’, असे बोस यांनी राजभवनातून जारी केलेल्या ऑडिओ संदेशात म्हटले आहे.
राष्ट्रपती राजवटीची मागणी या घटनेने पश्चिम बंगालचे राजकीय वातावरण तापले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या ढासळलेल्या परिस्थितीवर विरोधी पक्षांनी टीका केली.
‘केंद्रीय संस्थांच्या अधिकाऱ्यांवर हल्ला हा राज्याच्या संघीय रचनेवर हल्ला आहे. केंद्र सरकार ही घटना गांभीर्याने घेत आहे’, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री निसिथ प्रामाणिक म्हणाले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून या प्रकरणाचा राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) त्वरित तपास करावा आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.
प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अधीररंजन चौधरी यांनीही अशीच भावना व्यक्त केली. ‘तृणमूल काँग्रेसच्या राजवटीत पश्चिम बंगालमध्ये कायदा व सुव्यवस्था संपुष्टात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये तत्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी आमची मागणी आहे’, असे ते म्हणाले.