भाजप जागा सोडेना ,मग शिंदे-पवारांनी अमित शहा यांच्याकडे दिला हा प्रस्ताव
BJP did not leave the seat, then Shinde-Pawar gave this proposal to Amit Shah

लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षानं १९५ उमेदवारांची पहिली यादी यादी जाहीर केली. मात्र या यादीत महाराष्ट्रातील एकाही नावाचा समावेश नाही.
महायुतीतला जागावाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. मागील आठवड्यात गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर होते. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमु्ख्यमंत्री अजित पवारांसोबत सह्याद्री अतिथीगृहावर चर्चा केली.
पण जागावाटपाचा तिढा सुटला नाही. त्यानंतर शिंदे आणि पवार दिल्लीला गेले. अमित शहांशी अडीच तास चर्चा केली. पण त्यानंतरही जागावाटपाचा पेच कायम राहिला.
शिवसेना आधी २२ जागांसाठी आग्रही होती. राष्ट्रवादीनं १८ जागांची मागणी केली होती. पण भाजपनं ठाम भूमिका घेत वाटाघाटी सुरू केल्या.
त्यानंतर शिंदेसेनेची मागणी आधी १८, मग १३ वर आली. किमान माझ्या १३ खासदारांना तिकिटं द्या. त्यांचे मतदारसंघ शिवसेनेला सोडा,
अशी मागणी शिंदे यांच्याकडून शहा यांना करण्यात आली. भाजप ३२ ते ३७ जागांसाठी आग्रही आहे. तर शिवसेना, राष्ट्रवादीला ११ ते १६ सोडण्याची त्यांची तयारी आहे.
शिंदे, अजित पवार यांनी शहांची दिल्लीत भेट घेतली. पण शहांनी मित्रपक्षांना एकही अतिरिक्त जागा सोडण्याची तयारी दर्शवली नाही.
भाजपकडून शिंदेंना ९, तर अजित पवारांना ४ जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे. प्रत्यक्षात त्यांची मागणी अनुक्रमे १८ आणि ९ जागांची होती,
अशी माहिती सुत्रांनी दिली. तुम्हाला अतिरिक्त जागा दिसल्यास तिथे पराभवाची जोखीम असेल, असं भाजप नेतृत्त्वाकडून शिंदे, अजित पवारांना सांगण्यात आलं.
आगामी लोकसभेत प्रत्येक मतदारसंघ महत्त्वाचा असल्याचं भाजप नेतृत्त्वाकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं गेलं. त्यासाठी भाजपकडून करण्यात आलेल्या अंतर्गत सर्व्हेंचा हवाला देण्यात आला.
नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायची मनोमन इच्छा असेल तर अतिरिक्त जागा मागू नका, असं आवाहन भाजप नेतृत्त्वाकडून मित्रपक्षांना करण्यात आलं.
शिंदेंसोबत १३ खासदार आहेत. पण त्यांना तितक्या जागा सोडायला भाजप तयार नाही. अजित पवारांनादेखील हव्या तितक्या जागा सोडण्याची भाजपची तयारी नाही.
शहांचा आक्रमक पवित्रा आणि ठाम भूमिका पाहून मित्रपक्षांनी त्यांना ऍडजस्टमेंट प्लान सुचवला. ‘काही जागांवर आम्ही आमच्या पक्षाकडून सक्षम उमेदवार देतो.
तुम्ही त्यांना कमळाच्या चिन्हावर लढवा. त्यामुळे महायुतीमधील एकता टिकून राहिली,’ असा प्रस्ताव मित्रपक्षांनी दिला. भाजपनं हा प्रस्ताव स्वीकारला असून त्यावर फीडबॅक देण्याचं आश्वासन दिलं आहे.