राज ठाकरेंचा मोदींना बिनशर्त पाठिंबा ;संजय राऊत म्हणाले अमित शहांनी कोणती फाइल उघडली ?
Raj Thackeray's unconditional support to Modi; Sanjay Raut said what file did Amit Shah open?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंना केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी दिल्लीत अशी कोणती फाइल दाखवली की त्यांनी मुंबई येऊन थेट भाजपाला समर्थन जाहीर केलं?
असा सवाल उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. राज ठाकरेंनी मंगळवारी मसनेच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये
पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. यानंतर पहिली प्रतिक्रिया नोंदवताना संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेवर त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
“ते काही काळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना महाराष्ट्राचे शत्रू आहेत असं सांगत होते. महाराष्ट्रात पाऊल ठेऊ देऊ नका, ते महाराष्ट्राचे दुश्मन आहेत त्यांना राज्यात पाऊल ठेऊ देऊ नका असं आवाहन जनतेला करत होते.
आता अचानक असा हा कोणता चमत्कार, साक्षात्कार झाला हे तुम्ही त्यांना जाऊन विचारलं पाहिजे. असं काय झालं की तुम्ही अचानक पलटी मारुन महाराष्ट्राच्या शत्रूंना पाठिंबा देत आहात.
जनतेला काय उत्तर देणार? यामागील कोणतं कारण आहे? कोणती फाइल उघडली आहे? कोणती फाईल तुम्हाला दाखवली की मुंबईत आल्यानंतर
तुम्ही थेट त्यांना समर्थन जाहीर केलं,” असा सवाल राऊत यांनी विचारला आहे. तसेच पुढे बोलताना राऊत यांनी, बरं झालं उघड समर्थन दिलं. नाहीतर उमेदवार उभे करा, मतं खा हे राजकारण चांगलं नाही, असंही म्हटलं.
संजय राऊत यांनी मनसेचा नमोनिर्माण सेना पक्ष का झाला असा खोचक सवालही विचारला. “त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. महाराष्ट्रातील गेल्या काही दिवसांपासून जी लूट सुरु आहे.
महाराष्ट्रात जे अत्यंत घाणेरडं खोक्याचं राजकारण सुरु आहे. या साऱ्याचे सूत्रधार नरेंद्र मोदी आणि अमित शाह आहेत. महाराष्ट्रातून उद्योग पळवला जातो,
मुंबई तोडण्याचा प्रयत्न होतो, मुंबईला विकलांग करण्याचा प्रयत्न सर्वांना माहिती आहे. अशावेळेला महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी निर्माण झालेला एक पक्ष महाराष्ट्राच्या शत्रूंना पाठिंबा देत असेल
तर लोकांच्या मनात शंका निर्माण होतात. त्याची उत्तरं तुम्हीच द्यायची आहेत. असं काय घडलं की तुम्हाला अचानक या महाराष्ट्राच्या शत्रूंना पाठिंबा द्यावा वाटला.
याबाबत लोक त्यांना प्रश्न विचारतील. तुमचा जो पक्ष आहे त्याचा नमोनिर्माण पक्ष का झाला? नमोनिर्माण पक्ष होण्याची अचानक का गरज पडली? हे त्यांनी सांगावं.
त्यांच्या पक्षाने कोणती भूमिका घ्यावी हा त्यांचा निर्णय आहे. आम्ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, अस्मितेसाठी लढत आहोत. समोर मोदी असतील किंवा अमित शाह असतील तरी आम्ही शरणागती पत्कारणार नाही,” असं राऊत म्हणाले.
“राजकीय व्याभिचार कशाला म्हणतात हे प्रबोधनकार ठाकरेंच्या भाषणातून, लेखणातून समाजून घेतलं पाहिजे. आम्ही प्रबोधनकारांचे विचार मानणारे आहेत.
उद्धव ठाकरे तर त्यांचे नातून आहेत. राज्यातील ओवाळून टाकलेले भ्रष्टाचारी आणि व्याभिचारी यांना भाजपाने आपल्याकडे घेतलं आहे? त्यातले एक हे महाशय आहेत का नमोनिर्माणवाले? मला असं वाटत नाही.
राज्यातील सर्व ओवाळून टाकलेले भ्रष्टाचारी, व्याभिचारी, गुंड यांना आपल्या पक्षात, वॉशिंग मशिनमध्ये घेऊन साफ करणं हा व्याभिचार नाही का?
त्याच व्यासपीठावर आपण पाऊल ठेवलं असेल तर याचं उत्तर आपल्याला जनतेला द्यावं लागेल. हा त्यांचा निर्णय आहे. त्यावर त्यांनी बोललं पाहिजे,” असं संजय राऊत राज ठाकरेंना उद्देशून म्हणाले.
दरम्यान भारताला आज खंबीर नेतृत्त्वाची गरज असून मोदींच्या नेतृत्त्वाखाली देश पुढे जाण्यासाठी राज्यातील महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे
यांनी मंगळवारी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात केली. यावरून राज ठाकरेंवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही त्यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.
अंजली दमानिया म्हणाल्या, राज ठाकरे काल चुकचुकल्यासारखे आणि सैरभैर दिसत होते. त्यांना काय म्हणायचं होतं हेच कळेना. त्यांनी मोदींवर टीका केली, नोटाबंदी, बेरोजगारीवर बोलले,
त्यांचं काम आतापर्यंत नीट नव्हतं म्हणून टीका केली. मधूनच उद्धव ठाकरेंवरही टोला मारायचे. पण प्रत्येकवेळी जस्टिफिकेशन देत होते. आधी मी भाजपाचे समर्थन करत नव्हतो. आणि आता करणार आहे, याचं ते जस्टिफिकेशन करत आहेत.
“ऐरवी जसे राज ठाकरे बोलतात, तसं कालचं भाषण नव्हतं. त्यांची खुमासदार शैलीही नव्हती. ते बहुतेक त्यांच्या मनातसुद्धा कन्फ्युज होते.
त्यामुळे त्यांच्या भाषणानंतर मी ट्वीटही केलं की केहना क्या चाहते हो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मनसैनिक आले होते. पहिल्यांदाच त्यांनी छोटंसं भाषण केलं. तेही डिस्टर्ब झाले असतील.
भाजपाला पाठिंबा जाहीर करण्याच्या आधी ते म्हणाले की व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका. आणि स्वतःच त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला.
ईडीचं चक्र होतं म्हणूनच बिनशर्त पाठिंबा दिला का? इतकं काय लोककल्याण करणारे राजकारणी उरलेले नाहीत”, असा टोलाही त्यांनी लगावला.
नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून आपले त्यांच्याशी चांगले संबंध असून ते देशाचे पंतप्रधान व्हावेत, अशी सर्वांत प्रतम जाहीर अपेक्षा आपणच व्यक्त केली होती.
मात्र, त्यानंतर नोटबंदी, बुलेट ट्रेन या प्रकल्पांना आजही आपला विरोध कायम असून त्यांच्या न पटणाऱ्या धोरण, निर्णयावरही टोकाचा विरोध केला होता.
मात्र जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम कायदा, समान नागरी कायदा, याचे समर्थन करणाऱ्यांमध्ये आपणच पहिले होतो, होतो, असेही राज म्हणाले.