धनंजय मुंडे-सुरेश धस यांची गुप्त भेट ,भेटीवर जरांगे संतापले, केला वेगळाच संशय व्यक्त
Dhananjay Munde-Suresh Dhas' secret meeting, Jarange was angry at the meeting, expressed different suspicions

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया ,
मनोज जरांगे पाटील यांच्यासह भाजपाचे आमदार सुरेश धस अशा काही नेत्यांना हे प्रकरण लावून धरल्याचे पाहायला मिळत आहे.
या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे संबंध असल्याचा मुद्दा या नेत्यांकडून सातत्याने उपस्थित करण्यात आला आहे.
यादरम्यान आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात वेगवेगळे आरोप करणारे भाजपाचे नेते सुरेश धस हेच धनंजय मुंडे यांना त्यांच्या निवास्थानी जाऊन भेटले आहेत.
यानंतर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. यादरम्यान स्वत: सुरेश धस यांनी या भेटीबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.
सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याचे मान्य केले आहे. तसेच आपण डोळ्याच्या शस्त्रक्रियेनंतर मुंडेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेटल्याचे म्हणाले आहेत.
“मी स्वत: दिवसा त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो होतो. तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेटलो. तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत.
लढ्यामध्ये आम्ही त्यांच्या विरोधातच राहणार, फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो, तर त्यात गजहब करण्यासारखं काय आहे?,” असे सुरेश धस यावेळी बोलताना म्हणाले.
“परवा जेव्हा मी त्यांना भेटायला गेलो ते धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी गेलो होतो. तब्येतीची चौकशी करणे यात काही गैर नाही. संतोष देशमुखचा लढा आणि तब्येतीची चौकशी यामध्ये कसल्याही प्रकारचा संबंध नाही. कृपया जोडू नये”, असे सुरेश धस म्हणाले.
सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात काय चर्चा झाली? या प्रश्नावर बोलताना धस म्हणाले की, “काहीही चर्चा झाली नाही. फक्त तब्येतीची विचारपूस केली आणि माझा मी निघून आलो”.
“अदल्या रात्री दवाखान्यात नेण्यात आले होते. दुसर्या दिवशी निवासस्थानी जाऊन भेटलो. भेटल्यानंतर पुन्हा एकदा बाहेर आल्यानंतर काय केलं ते पाहून घ्या. पुढच्या एक दोन दिवसात आणखी नवीन काही गोष्टी सांगणार आहे”, असेही सुरेश धस यावेळी बोलताना म्हणाले.
“मी अजूनही धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला नाही, हे मी पहिल्यापासून सांगतोय. त्यांचा राजीनामा त्यांच्या पक्षाचेच लोक आणि इतर लोक राजीनामा मागत आहेत.
त्यांचा राजीनामा घेणं – न घेणं हे सर्वस्वी अजित पवारांच्या हातात आहे. लढा सुरूच राहणार आहे. हे लोक फाशीवर जाईपर्यंत हा लढा सुरूच राहाटणार आहे,” असेही धस यावेळी म्हणाले.
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी या मुद्द्यावरून सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘हे तर नवीन ऐकालाच मिळालं आहे, अवघड आहे. हे धक्कादायक आहे. गोरगरिब समाज न्यायाच्या प्रतिक्षेत आहे.
एखाद्याकडून अपेक्षा करतोय, फाल्तूचं राजकारण व्हावं, हे अपेक्षित नाही. गोरगरिबांचं घर उन्हात पडलं आहे. हे बरोबर नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. धसांच्या विश्वासार्हतेला तडा केला,
धसांवर राजकीय दबाव आला असेल. सुरेश धसांकडून ही अपेक्षा नव्हती. त्यांचं त्यांना लखलाभ. काय काय घडलं ते सगळं जनतेला सांगतील. परिस्थिती अशी आहे, सुरेश धस यांनी हे टाळायला हवं होतं’, असं म्हणत मनोज जरांगे यांनी सुरेश धस यांच्यावर टीका केली आहे.
या प्रकारावर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली.‘या भेटीत काय चर्चा झाली, काय बोलले हे अण्णाचं (सुरेश धस) सांगतील. ते स्वत: प्रतिक्रिया देतील.
त्यांच्यात काय बोलणे झाले याबद्दल मला काहीच माहिती नाही त्यामुळे मी काही बोलू शकत नाही. आम्ही न्याय मागत आहेत. आमच्या सर्वांची ती मागणी आहे.
अतिशय चुकीच्या पद्धतीने माझ्या भावाची हत्या झाली त्याचे समर्थन करणे त्यांना करणे आहे.अण्णांची ती भूमिका कायम राहणार आहे. अण्णा त्यासाठी पुरावे देत आहेत, लढा देत आहेत. सातत्याने पाठपुरावा करत आहेत’ असं धनंजय देशमुख म्हणाले.
तसंच, ‘अण्णांची हीच भूमिका राहणार आहे. अण्णा न्यायासाठी आहेत. अण्णांची भूमिका बदलणार नाहीत. आरोपींना फाशी होईपर्यंत अण्णा याच भूमिकेत असतील. अण्णा आणि मुंडे यांच्या भेटीबाबत या संदर्भात अण्णांशी आपले काहीच बोलणे झाले नाही’ असंही धनंजय देशमुख यांनी सांगितलं.