मुख्यमंत्री पदाबाबत काय म्हणाले अजितदादा
What did Ajit Dada say about the post of Chief Minister?

गणपती बाप्पाला निरोप देताना आज मन जड झालं आहे. सगळ्यांना आपले नेते मुख्यमंत्री व्हावे असं वाटतं, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणताच पत्रकारांनी ‘तुम्हालाही वाटतं का?’ असा प्रतिप्रश्न केला.
त्यावर अजितदादांनी चिडून ‘सगळ्यांना वाटतं म्हटल्यावर त्यात दादाही आलाच..असं काय करतोस रे तू?’ असं करवादून म्हटलं.
पण नंतर लगेच हसत सावरुनही घेतलं. उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील मंडईत दाखल झाले.
सगळ्यांना आपले नेते मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं, सगळ्यांना वाटतं म्हटल्यावर त्यात दादाही आलाच. सगळ्यांचं मत असतं, मात्र सगळ्यांचीच इच्छा पूर्ण होते असं नाही.
मात्र त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मतदानाचा अधिकार मतदारांच्या हातात असतो. आणि ते ठरवतात तसंच १४५ ची फिगर असणं देखील आवश्यक आहे, असं अजित पवार म्हणाले.
कोविडच्या काळापासून बऱ्याच सणांवर मर्यादा आल्यात. देवदर्शनाने सगळंच होतं असं नाही. तो एक वेगळा भाग आहे, आणि काम करून लोकांचा विश्वास संपादन करणं हा एक वेगळा भाग आहे, असं अजित पवार म्हणाले.
महायुतीचं सरकार आणण्यासाठी आम्हा सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. महायुतीचं सरकार आल्यानंतर आम्ही सगळे एकत्र बसू आणि निर्णय घेऊ.
आत्ताच्या विधानसभा निवडणुका आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहोत, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
संपूर्ण गणेशोत्सव नामानिराळे राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी सोमवारी मुंबईतील लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी आदी मंडळांना भेट दिली.
त्यानंतर पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही घरातील गणरायाचे त्यांनी दर्शन घेतले. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी मात्र पवार यांनी सोमवार सायंकाळपर्यंत भेट दिली नव्हती.
केंद्रीय गृहमंत्री मुंबईत असतानाही, अजित पवार दिसले नाहीत. त्यावर ‘माझ्यामुळे गणेशदर्शन करण्यास येणाऱ्या जनतेची गैरसोय होऊ नये, यासाठी इतके दिवस मंडळांना भेट दिली नव्हती,’ असा खुलासा पवार यांनी केला आहे.