संसदेत सरकारला थेट सवाल, पहलगाममध्ये हल्ला झाला तेव्हा गृहमंत्रालय आणि CISF काय करत होते?
Direct question to the government in Parliament, what were the Home Ministry and CISF doing when the attack took place in Pahalgam?


जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या भ्याड हल्ल्यात एकूण 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता.
या हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर थेट एअर स्ट्राईक केले होते. या पार्श्वभूमीवर ऑपरेशन सिंदूरबाबत संसदेत चर्चा करण्यात आली. यावेळी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला तरी कसा? हा हल्ला झाला तेव्हा “गृह मंत्रालय काय करत होतं? CISF काय करत होतं? असे थेट सवाल उपस्थित केले.
तर “अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसमोर उभं राहिल्यावर तुमची उंची 5 फूट होते आणि 56 इंचाच्या छातीचं माप कमी होऊन 36 इंचांचं राहतं. तुम्ही अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना इतकं का घाबरता? असे सवाल उपस्थित करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.
दरम्यान, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज (२८ जुलै) संसदेत ऑपरेशन सिंदूरबाबत सविस्तर माहिती दिली. या मोहिमेचा उद्देश काय होता, भारतीय सैन्याने ही कारवाई कशा पद्धतीने केली
आणि या संपूर्ण प्रक्रियेत सरकारची भूमिका काय होती? यावर त्यांनी स्पष्टपणे प्रकाश टाकला. राजनाथ सिंह यांनी सांगितले की, या कारवाईत 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
विशेष म्हणजे, भारतीय सैन्याने हे ऑपरेशन केवळ 22 मिनिटांत पूर्ण केले. ही कारवाई 6 ते 7 मे 2025 दरम्यान पार पडली. 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले,
असेही त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले. ऑपरेशननंतर भारताने पाकिस्तानच्या डीजीएमओशी थेट संपर्क साधून यासंदर्भातील माहिती दिली, असेही राजनाथ सिंह यांनी नमूद केले.
दरम्यान, सपा खासदार रामशंकर राजभर यांनी संसदेत म्हटले आहे की, 100 दहशतवादी मारले गेले, पण त्यात त्या चार दहशतवादींचा समावेश होता की नाही. सरकारने हे सांगितले नाही.
पहलगाम हल्ल्याचा बदलाही 18 दिवसांनी घेण्यात आला. देशात इतका संताप होता की त्यांना ऑपरेशन तंदूर हवा होता, सिंदूर नव्हे.
पण, तुम्ही फक्त तीन दिवसांत ऑपरेशन पूर्ण केले. ज्या व्यक्तीला आम्ही विश्वगुरू मानत होतो, तो व्हाईट हाऊसमध्ये बसलेला निघाला, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.








