पंकजा मुंडेंनी पत्रकारांसमोर व्यक्त केली मनातली खंत
Pankaja Munde expressed her regret in front of reporters


निवडणूक कोणतीही असो, माझ्या नावाची चर्चा होतेच, असं वक्तव्य भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे. तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन झाल्यामुळे मला मतदारसंघ राहिलेला नाही,
असा प्रश्न निर्माण होत असल्याचंही पंकजा म्हणाल्या. पंकजा मुंडे सध्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव म्हणून मध्य प्रदेशची जबाबदारी सांभाळत आहेत.
भाजपच्या ‘गाव चलो’ अभियानात पंकजा मुंडे सहभागी झाल्या होत्या. बीड शहराजवळ असलेल्या नारायण गडावर जाऊन पंकजा यांनी नगद नारायणाचं दर्शन घेतलं. त्यानंतर कोंडुळ गावी जाऊन त्यांनी तिथल्या ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या.
“गेल्या पाच वर्षात कोणती निवडणूक अशी आली, की ज्यात माझं नाव नव्हतं? सांगा बरं.. कोणतीही विधानपरिषद निवडणूक आली,
राज्यसभा आली, की त्यात माझं नाव चर्चेला येतं. त्यामुळे मला यात काही नावीन्य वाटलं नाही” असं पंकजा मुंडे पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.
“साहजिक आहे, बरीच वर्ष झाली, मी एका पदाच्या प्रतीक्षेत आहे, असं लोकांना किंवा मीडिया यांना वाटू शकतं. अनेक विधान परिषद किंवा राज्यसभा सदस्य होऊन गेले, त्या हिशोबाने लोक माझं नाव घेतात.” असंही पंकजा पुढे म्हणाल्या.
“आता या युतीमुळे.. युती नाही.. हे जे नवीन तीन पक्षांचं सरकार आहे, त्यामुळे साहजिक एक प्रश्नचिन्ह आहे, की मला मतदारसंघच राहिला नाही,
त्यामुळे नॅचरली या चर्चा येतात, त्या आधीही आल्या आहेत, आणि आताही आहेत, पण त्याला मी काही करु शकत नाही” असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.
पंकजा मुंडे यांना राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांची गेल्या सोमवारी रात्री उशिरा भेट घेतली होती.
यावेळी दोघांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा चालली होती. या भेटीनंतर पंकजा मुंडे यांची राज्यसभेवर वर्णी लागण्याच्या चर्चांना उधाण आलं होतं, परंतु उमेदवारी देण्याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असं म्हणत फडणवीसांनी चेंडू टोलवला होता.









