छगन भुजबळांचा मनोज जरांगेवर पलटवार ,म्हणाले…..
Chhagan Bhujbal's counter attack on Manoj Jarange, said.....

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे हे एकाच भाषणात दुहेरी बोलतात. त्यांच्या स्मरणशक्तीत काहीतरी गडबड आहे. बीडमधील हॉटेलची जाळपोळ, शिक्षण संस्थांचे नुकसान भुजबळांच्या माणसांनी केल्याचे त्यांनी म्हटले.
तत्पुर्वी त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांवर तोच आरोप केला होता. काही वेळाने भाषणात जरांगे हे मराठ्यांच्या वाट्याला जाऊ नका, नाहीतर बीडला काय होते ते लक्षात ठेवा, असा इशारा देतात.
याचाच अर्थ बीडला जे घडले, ते जरांगे यांनी केल्याचे सिध्द होते. त्याची अप्रत्यक्ष कबुली भाषणातून त्यांनी दिल्याचा दावा करुन भुजबळ यांनी जरांगे यांच्यावर टिकास्त्र सोडले.
एकाच भाषणात उलटसुलट भाष्य येऊ नये म्हणून जरांगे यांनी अनुलोम, प्राणायाम, ध्यानधारणा करावी, असा सल्ला भुजबळांनी दिला.
जरांगे यांनी सभेतून केलेल्या आरोपांना भुजबळांनी येथे प्रत्युत्तर दिले. इशारा सभेतील त्यांचे अर्धे भाषण भुजबळांवर होते. आपल्याविषयी ते बोलले नाहीत तर, ते भाषण तरी काय करणार, हा स्वाभाविक मुद्दा आहे.
त्यांच्या कोल्हेकुईला आपण दाद देत नाहीत. त्यांच्या जन्माच्या आधीपासून आपण लढत आहोत. जरांगे हे एकतर बाहेर मोठ्या गर्जना करतात नाहीतर, रुग्णालयात असतात. त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी. लोकशाही मार्गाने लढा द्यावा, असे भुजबळ यांनी सूचित केले.
जातगणना करण्याची मागणी आपण अनेक दशकांपासून करीत आहोत. जात गणनेतून प्रत्येक समाजाची लोकसंख्या कळेल. लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देता येईल.
ओबीसी हा ३७४ लहान जातींचा एक वर्ग आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाची क्युरेटिव्ह याचिका दाखल करून घेतली असून हा मराठा समाजाला मोठा दिलासा आहे.
२३ जानेवारीपासून त्याची सुनावणी होईल. मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्यास आमचा कधीही विरोध नव्हता. विधानसभेत आपण त्याला पाठिंबा दिला होता, असा दाखला त्यांनी दिला.