300 मतदारांचा मतदानावर बहिष्कार;काय घडले कारण?
Voter Boycott on Polling; What Happened?

अकोला शहरातील बिर्ला कॉलनी भागात राहणाऱ्या 70 कुटुंबातील 300 मतदारांनी अकोला लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.
या कुटुंबीयांची जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी समजूत काढली. मात्र, जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही; तोपर्यंत मतदान करणार नाही, अशी भूमिका संबंधितांनी घेतली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला शुक्रवारी सकाळपासून सुरूवात झाली, पण अकोला शहरातील बिर्ला कॉलनीतील 70 कुटुंबीयांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.
या निर्णयानंतर जिल्हाधिकारी कुमार यांनी तातडीने या कामगारांच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. तुमचं म्हणणं मी सरकारपुढे सादर करतो, तुम्ही आता मतदान करा,
असे त्यांनी कामगारांच्या कुटुंबीयांना सांगितले. मात्र, जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही; तोपर्यंत मतदान करणार नाही, असा पवित्रा कामगारांच्या कुटुंबीयांनी घेतला आहे, त्यामुळे या वादावर तोडगा निघू शकलेला नाही.
अकोल्याच्या बिर्ला कॉलनीतील कुटुंबांना जागा खाली करण्यास सांगण्यात आले आहे, त्याविरोधात बिर्ला कॉलनीतील कामगार कुटुंबीयांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
गेल्या दीड महिन्यापूर्वी उपोषणाला बसले आहेत. त्या कामगारांच्या 70 कुटुंबांना प्रशासनाने घरे खाली करण्याची नोटीस दिल्याने त्यांनी उपोषण पुकारले आहे. मात्र, त्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही.
अखेर या 70 कामगार कुटुंबीयांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेतला आहे. तब्बल 250 हून अधिक मतदारांनी मतदानावर बहिष्कार घातला आहे, असे कृष्णा तायडे यांनी सांगितले.
अकोल्यातल्या बिर्ला कॉलनीत 70 कामगारांचे कुटुंबीय वास्तव्यास आहेत. घरे खाली करण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रकरण सुरू आहे.
सुनावणी सुरू असताना 70 कुटुंबांना घरे खाली करण्याबाबत नोटीस बजावली आहे. घरे खाली केल्यास सर्व 70 कामगार कुटुंबीय अडचणीत येणार आहेत.
कामगारांनी साखळी उपोषण केले होते. मात्र, त्यांची बाजू ऐकून घ्यायला प्रशासनातील एकही अधिकारी आलेला नाही, त्यामुळे कामगारांच्या कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला आहे.









