पवारांवर टीका धनंजय मुंडे म्हणाले अमित शाह खोटे बोलणार नाहीत
Criticizing Pawar, Dhananjay Munde said Amit Shah will not lie

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
तथ्य असल्याशिवाय शहा बोलणार नाहीत, असं सूचक वक्तव्य मुंडेंनी केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी पुण्यात भाजपच्या बैठकीत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती.
पवार भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार असल्याचा आरोपही शहा यांनी केला. टिकणाऱ्या आरक्षणासाठी भाजपचे सरकार यायला हवे. यांची सत्ता आली तर आरक्षण गायब होईल, असा आरोपही शहा यांनी केला होता.
राज्याचे मंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. असे आरोप करण्याजोगे
काही तरी तथ्य असल्याशिवाय शहा बोलणार नाहीत. मात्र, शहा बोलल्यानंतर यावर आपण यावर बोलणे योग्य नाही, अशी पुस्तीही मुंडे यांनी जोडली.
अजित पवार यांच्या उपस्थितीत नगरमध्ये महिला संवाद मेळावे होत आहेत. त्यासाठी मुंडे नगरला आले आहेत. त्यांनी शिर्डीत साई समाधीचे दर्शन घेऊन आपल्या दौऱ्याची सुरुवात केली.
साईबाबांच्या दर्शनानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद सधला. रविवारी शहा यांनी पवार यांच्यासंबंधी केलेल्या वक्तव्यासंबंधी विचारले असता मुंडे यांनी ही प्रतिक्रिया दिली.
गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून शिर्डीत दर्शन घेतल्यानंतर मुंडे म्हणाले, गोपीनाथ मुंडे माझे राजकीय गुरू आहेत. तर पुढे चालून अजित पवार यांनी अतिशय कठीण प्रसंगात मला राजकीय आधार दिला.
गुरू आणि मोठे बंधू म्हणून अजित पवार यांनीच मला इथपर्यंत पोहचवले असल्याने अजित पवारच माझे खरे गुरू आहेत, असेही मुंडे म्हणाले.
राजकीय विषयांवर बोलताना मुंडे म्हणाले, निवडणुका स्वबळावर लढणार अशा केवळ प्रसारमाध्यमांत चर्चा आहे. प्रत्यक्षात महायुतीमधील कोणताही पक्ष स्वबळावर निवडणूक लढविणार नाही.
आम्ही सर्वजण एकत्रच निवडणूक लढविणार आहोत. जागा वाटपाचा निर्णयही त्याप्रमाणे होईल, असेही मुंडे म्हणाले.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही मुंडे यांनी आरोप केले. ते म्हणाले, विशाळ गडावर जे घडले, त्यासंबंधी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही.
मुस्लिमांचा उपयोग लोकसभा निवडणुकीत मतांसाठी केला आणि नंतर त्यांना वाऱ्यावर सोडले, हे आता मुस्लिम समाजाला कळले आहे, असेही मुंडे म्हणाले.