Monsoon Marathwada;पावसाळ्यात देशभरात भरपूर पाऊस पडणार, मात्र मराठवाड्यासाठी हवामान विभागाची चिंताजनक बातमी
There will be a lot of rain across the country during the monsoon season, but the Meteorological Department has worrying news for Marathwada.

मान्सूनआधीच प्री मान्सून पावसानं मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये धुवाँधार बॅटिंग केली आणि दाणादाण उडवली आहे.
महाराष्ट्रात मागच्या 24 तासात अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अति मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली. यादरम्यान पिकांचं फळबागांचं अतोनात नुकसान झालं आहे.
तर अनेक घरांवरील पत्रे उडून गेले. कल्याणमध्ये चार मजली इमारत कोसळली. प्री मान्सूनचा प्रभाव आणखी चार दिवस राहणार आहे. याच दरम्यान मान्सूनबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे! यंदा मान्सून वेळेआधीच राज्यात दाखल होणार, असा अंदाज भारतीय हवामान खात्यातील (IMD) अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.
यासोबतच, यंदा राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता असून, मराठवाड्यातील काही भागांमध्ये मात्र सामान्यपेक्षा कमी पाऊस राहण्याचा अंदाज आहे, अशी माहिती राज्यस्तरीय खरीप हंगाम नियोजन बैठकीत देण्यात आली.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, केरळमध्ये मान्सून पुढील ३ ते ४ दिवसांत दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याची वाटचाल महाराष्ट्राकडे सुरू होईल.
वेळेआधी मान्सूनचे आगमन आणि सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बाब आहे. खरीप हंगामाच्या तयारीला यामुळे अधिक गती मिळणार आहे.
मात्र, मराठवाड्यातील काही भागांमध्ये कमी पावसाचा अंदाज असल्याने तेथील शेतकऱ्यांनी पाणी व्यवस्थापनाबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर ही माहिती अत्यंत महत्त्वाची असून, शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या पुढील अपडेट्सवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. 25 मेच्या आसपास मान्सून केरळमध्ये दाखल होईल.
त्यानंतर हळूहळू पुढे सरकेल. कोकणात मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होणार आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रात 10 ते 15 जूनपर्यंत मान्सून दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
2009 पासून पहिल्यांदाच असं घडलंय की मान्सून वेळेआधी दाखल होत आहे. मान्सून नियमित वेळेपेक्षा ५ दिवस आधीच येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
यंदा पाऊस चांगला होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तर सप्टेंबरपर्यंत पाऊस राहणार असल्याचंही सांगितलं आहे.