उद्या एक्झिट पोल बाबत ,काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
Congress has taken a big decision regarding the exit poll tomorrow

लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या उद्या (1 जून) सातव्या टप्प्यातील मतदानानंतर 4 जून रोजी निकाल हाती येतील. त्याआधी एक्झिट पोलचे निकाल उद्या सायंकाळी पाच वाजल्यापासून टीव्ही वृत्तवाहिन्यांवर दाखवले जातील.
वृत्तवाहिन्यांवर या निकालांवर चर्चा सुद्धा होईल. मात्र, काँग्रेस पक्षाने या चर्चेत सहभागी होण्यास नकार दिला आहे. मतदानाच्या शेवटच्या टप्प्यानंतर टीव्ही चॅनेल्सवर प्रसारित होणाऱ्या एक्झिट पोलच्या चर्चेत
सहभागी न होण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक्झिट पोलच्या माध्यमातून बेटिंग मार्केटवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळे पक्ष 4 जूनला निकालाची वाट पाहणार आहे.
काँग्रेसने यावेळी विरोधी इंडिया आघाडी सरकार स्थापन करेल आणि 2004 मध्ये जे घडले त्याचीच पुनरावृत्ती यावेळी होईल, असा दावा केला आहे. 2004 मध्ये भाजपने इंडिया शायनिंगचा नारा दिला होता
आणि पुन्हा भाजपचे सरकार येईल, असा दावा केला जात होता, पण उलटा निकाल आला होता. केंद्रात यूपीएचे सरकार स्थापन झाले होते. तोच पुन्हा चमत्कार होईल, असा काँग्रेसने पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे.
दरम्यान, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी गुरुवारी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला पूर्ण बहुमत मिळेल आणि त्यानंतर अवघ्या 48 तासांत पंतप्रधानांची निवड केली जाईल.
ज्याला जास्त जागा मिळतील त्यांचा पंतप्रधानपदासाठीही अधिक दावा असेल. सात टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी
दिलेल्या मुलाखतीत काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी विश्वास व्यक्त केला की इंडिया आघाडीला 272 च्या आकड्यापेक्षा कितीतरी जास्त जागा मिळतील.
निवडणुकीनंतर नितीश कुमार आणि टीडीपी अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू यांसारख्या एनडीए सहयोगींसाठी दरवाजे खुले असतील का? या प्रश्नावर ते म्हणाले की,
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाले तर एनडीएचे सहयोगी देखील युतीमध्ये सामील होऊ शकतात. तथापि, त्यांचा समावेश करायचा की नाही हे काँग्रेस हायकमांड ठरवेल.
मतदानाच्या सहा टप्प्यांनंतर ग्राउंड लेव्हलवरच्या राजकीय परिस्थितीच्या त्यांच्या आकलनाबाबत विचारले असता रमेश म्हणाले की, “मला आकड्यांमध्ये जायचे नाही,
परंतु मी एवढेच सांगतो की आम्हाला स्पष्ट जनादेश मिळेल. जेव्हा मी स्पष्ट आणि निर्णायक म्हणतो तेव्हा मला 272 जागांपेक्षा जास्त असे म्हणायचे आहे. 2004 च्या निकालाची पुनरावृत्ती 2024 मध्ये होईल, असा दावा त्यांनी केला.